व्हॉटस् ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर अपलोड स्वरचित स्टेटसचे पुस्तकच झाले. ही अनोखीच गोष्ट आहे. “स्टेटस’ ते “पुस्तक’ हा प्रवास युवा लेखक आदित्य महाजनने केला आहे.
गेल्या तीन वर्षात आदित्य दररोज व्हॉटस् ऍप स्टोरीला शायरी, चारोळ्या पोस्ट करायचा. या कलेला रसिकांनी पसंती दिली. नियमित होणाऱ्या लिखाणाची प्रशंसा झाली, दाद मिळाली आणि तयार झाले “दीदार’ हे पुस्तक. 2016 ते 2018 या वर्षात त्याने नित्यनियमाने रोज एक याप्रमाणे 1100 हिंदी-उर्दू शायरी लिहिल्या. यातील 201 हिंदी-उर्दू चारोळ्यांचा समावेश असणाऱ्या “दीदार’चे नुकतेच पुण्यात अभिनेता, दिग्दर्शक आलोक राजवाडे याच्या हस्ते प्रकाशन झाले. याला अभिनेता वैभव तत्ववादी याची प्रस्तावना असून. चित्रकार अपर्णा निलंगे आणि मिहीर जोगळेकर यांनी चित्रांची जोड दिली.
चारोळी, शायरी साधारण 2016 पासून स्टेटस्ला ठेवत होतो. सुरूवातीला त्याला अनेक “लाईक्स’ मिळत होते. त्यानंतर ते व्हायरल होऊ लागले. रसिकांनी भरपूर दाद आणि प्रेम दिले. या सवयीमध्ये खंड पडू न देता स्वरचित साहित्य “शेअर’ करु लागलो. ते लोकांना आवडू लागल्याने पुस्तक होऊ शकेल. असे वाटल्याने”दीदार’ तयार झाले, असे आदित्य म्हणाला.
“दीदार म्हणजे प्रेमाने पाहणे’. त्यामुळे आजच्या काळातील “प्रेम’ यातून व्यक्त होत आहे, अशी भावना आदित्य व्यक्त करतो.दुसऱ्याच्या मार्गापेक्षा स्वत:ची “स्टाईल’ विकसित करा. मोठ्या लेखकांचा प्रभाव आवश्यक आहे, मात्र यामध्ये नव्या लेखकांनी त्यांच्या शैलीवर भर दिला पाहिजे, असे आदित्य नमूद करतो.