नियमानुसार परवानगी देऊन अधिकृत रिक्षा थांबे उभारण्याची गरज
18 ते 20 हजार रिक्षा : अनधिकृत थांबे ठरताहेत वाहतूक कोंडीचे कारण
पिंपरी – दिसला चौक की केल्या रिक्षा उभ्या, एखादी नवीन सोसायटी झाली की गेटसमोर आल्या रिक्षा, एखादे नवीन दुकान, हॉटेल उघडले की समोर आल्या रिक्षा. संपूर्ण शहरात कुठेही पाहिले तरी रिक्षा स्टॅंडच दिसतात. एकेका चौकात तीन ते चार रिक्षा स्टॅंड असतात. एवढेच काय तर पिंपरी-चिंचवड हे बहुधा एकमेव असे शहर असावे, जिथे उड्डाणपुलांवर देखील रिक्षा स्टॅंड आहेत. शेकडोंच्या संख्येत रिक्षा स्टॅंड आणि हजारो रिक्षा असताना शहरात अधिकृत रिक्षा स्टॅंड केवळ 77 आहेत. रिक्षा स्टॅंडला परवानगी मिळत नसल्याने अनधिकृत रिक्षा स्टॅंडचे पेव फुटले आहे.
सध्या खुल्या पद्धतीने रिक्षा परवाने वाटले जात आहेत. यामुळे रिक्षांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात 18 ते 20 हजार रिक्षा आहेत. याचाच अर्थ की, प्रत्येकी अधिकृत रिक्षा स्टॅंडवर 250 हून अधिक रिक्षा उभ्या कराव्या लागतील. शहरात धावणाऱ्या रिक्षांच्या तुलनेत अधिकृत थांबे खूपच कमी आहेत. परिणामी रिक्षा रस्त्यावर कुठेही उभ्या केल्या जातात आणि मनानेच रिक्षा स्टॅंड तयार केले जाते. मुख्य शहरात आणि उपनगरात अर्ध्याहून अधिक रस्ता अडवून रिक्षा उभारलेल्या असतात. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचाही बकालपणा दिसून येत आहे.
रस्त्यावर रिक्षा थांबा उभारण्यासाठी वाहतूक, महापालिका आणि आरटीओच्या समितीच्या मार्फत थांब्यांना परवानगी देण्यात येते. आरटीओच्या नोंदणीत केवळ संपूर्ण पुण्यात केवळ 922 रिक्षा थांब्यांची तर, पिंपरी-चिंचवड शहरात केवळ 77 रिक्षा थांब्यांची नोंदणी आहे. तर, 2018 ते 2019 च्या आर्थिक वर्षात सहा हजार रिक्षांची भर पडली असल्याने एकूण 18 हजार रिक्षा शहरात धावत आहेत. सध्या वाहतूक शाखेकडून नवीन थांब्यांना परवानगी तात्पुरती थांबविल्याने सर्व अर्ज लांबणीवर पडले आहेत.
अशी मिळते मंजुरी
शहरात अस्तित्वात असलेल्या रिक्षांना व मागणीनुसार “आरटीओ’ रिक्षा थांब्यांना परवानगी देत असते. त्यासाठी वाहतूक पोलीस विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि “आरटीओ’ची समिती स्थापन करण्यात आली असून, त्या जागेची पाहणी केल्यानंतर त्या जागेची निश्चितीकरण करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून तेथील वाहतुकीबाबत अडचणी व भविष्यात होऊ शकणाऱ्या कोंडीची शक्यता लक्षात घेऊन अभिप्राय सादर करतात. तसेच, महापालिकेला रस्ते व अतिक्रमणच्या जागेबाबात शहानिशा करतात. त्यानंतर त्या थांब्याला मंजुरी दिली जाते. एका थांब्याला जास्तीत जास्त किती रिक्षा थांबाव्यात याची पाहणी समिती करते. त्यानंतरच त्याला मंजुरी मिळते.
आरटीओकडे रिक्षा थांब्यासाठी अर्ज आल्यास त्याची समितीमार्फत पाहणी करुन तो मंजुरीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात येतो. तेथे त्यावर अंतिम निर्णय होतो. तसेच, रिक्षा थांब्यावर कारवाई वाहतूक शाखा करते. त्याबाबत तक्रार आल्यास तो अहवाल प्राधिकरणाकडे पाठविण्यात येतो.
आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड शहरात सुमारे वीस हजार रिक्षा आहेत. किमान तीनशे रिक्षा थांब्याची आवश्यकता आहे. रिक्षा धारकांना थांबा नसल्यामुळे त्यांना आपली रिक्षा रस्त्यावर कुठेही उभी करावी लागते आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. वाहतूक विभाग आणि आरटीओ यांनी रिक्षा थांब्याच्या परवानगी बाबत विचार करावा.
-बाबा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र