आ. कर्डिले कार्यक्रमाबाबत अनभिज्ञ
आमदार शिवाजी कर्डिले हे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य असूनही विद्यापीठ प्रशासनाने त्यांना व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना समारंभाचे निमंत्रण दिले नाहीच किंवा साधी माहिती पण दिली नाही. त्यामुळे आमदार कर्डिले या कार्यक्रम विषयी अनभिज्ञ होते.
राहुरी – कृषी विद्यापीठात 40 टक्के पदे रिक्त असणे दुर्देव आहे. तरीही विद्यापीठाचे कामकाज कसे चालते…? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. राहुरी कृषी विद्यापीठात संशोधन प्रकल्प पाहणीनंतर शास्त्रज्ञ, संशोधक यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
डॉ. नानासाहेब पवार सभागृहात ते पुढे म्हणाले, इतकी पदे रिक्त असताना शास्त्रज्ञ कामे कशी करतात आणि त्यांना झोप तरी कशी लागते हा प्रश्नच मला पडला आहे. याविषयीचे प्रश्न मी सरकारकडे मांडणार असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, आज जमिनीवरील भार वाढत चाललाय.
देश स्वतंत्र झाला. तेव्हा 35 कोटी पैकी 80 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती. आज 120 कोटीपैकी तेवढीच टक्के संख्या शेतीवरच अवलंबून आहे.शेतजमीन कमी होते आहे. कुटुंबात दोन मुलं असतील तर एकाने शेती करावी आणि एक जणाने नोकरी करावी. आता राजकारण हे सगळं सोडून द्या. महात्मा फुलेंच्या नावाने काम करणारे विद्यापीठाचा नंबर 34 वरुन चोवीसवर आली पण हा नंबर ही निश्चितच शोभा दायक नाही.
राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये नुकतेच शरद पवार यांनी संशोधनाची पहाणी करत प्रक्षेत्राला भेट देत शिक्षण, संशोधन व विस्तार याची अधिक माहीती जाणून घेतली. कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा, डॉ.अशोक फरांदे, डॉ.शरद गडाख, कुलसचिव डॉ.सोपान कासार, मिलिंद ढोके, डॉ.आनंद सोळुंके, डॉ. माधव देसाई, डॉ. प्रकाश तुरबटमठ आदी हजर होते. डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी सूत्रसंचालन केले. विभागप्रमुखांनी कामांचे सादरीकरण केले. माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रसाद तनपुरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, अरुण कडू, विजय कडू आदी उपस्थित होते.