बदलत्या हवामानाचा परिणाम; आर्थिक उलाढाल मंदावली
पारनेर – तालुक्यातील कान्हुरपठारसह पठार भागाची ओळख असलेल्या वाटाणा पिकावर यंदा बदलते हवामान तसेच मागील महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्याची पहिली, दुबार व काही ठिकाणी तिसरी पेरणीही वायला गेली. याचा परिणाम म्हणून बाजारात वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असुन आर्थिक उलाढाल मंदावली आहे.
पठार भागातील विरोली, पिंपरी पठार, वडगाव दर्या, पिंपळगाव रोठा, गोरेगाव यासह अन्य गावांमधुन रोज कान्हुरपठार येथे तीन हजार गोण्या (दिडशे टन) वाटाण्याची आवक होत होती. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे 2007 पासुन वाटाणा पिकाचे प्रमाण कमी झाले. यंदा ही आवक अवघी 10 टनावर येऊन ठेपली आहे. बेभरवसी व कधीतरी पडणार संततधार पाऊस, निकृष्ठ बियाणे, पिकावरील रोगामुळे शेतकरी अन्य पिकाकडे वळताना दिसत आहे.
पुर्वी या पिकाला एकरी सहा हजार रूपये खर्च येत होता. तो आता बियाण्यांच्या किमती कमी झाल्याने 4 हजार रूपये एकरी खर्च येत आहे. त्यामुळे कमी खर्चात लवकर येणारे पिक व पैसे उपलब्ध करून देणारे पिक अशी ओळख वाटाण्याची झाली आहे. परंतू यावर्षी या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकाचा विमा उतरविला जात नसल्याने त्याची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. मालाची आवक घटल्याने त्यावर असणारे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. मागील वर्षी आवक जास्त प्रमाणात होती.
दीडशे टनांची आवक येथे होत होती. मात्र, आता ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. आम्ही व्यापारी कान्हुर वगळता जखणगाव, काळकुप, भाळवणी, भांडगाव या ठिकाणी वाटाणा घेण्यासाठी जात आहोत. श्रावणी पोळ्याच्या सुरवातीला वाटाण्याची तोडणी होते.
संतोष शेळके व्यापारी.