मराठीत एक म्हण आहे तेलही गेले, तूपही गेले अन् हाती धुपाटणे आले. अशीच काहीशी परिस्थिती अभिनेत्री आलिया भट्टची झाली आहे. ती सलमानसोबत संजय लीला भन्साळी यांच्या “इंशाल्लाह’ चित्रपटात झळकणार होती.
मात्र, सलमान आणि बन्साळी यांच्यात झालेल्या काही मतभेदांमुळे दिग्दर्शक भन्साळी यांनी हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा फटका आलियाला बसला. आलियाने या चित्रपटात काम करण्यासाठी आमिरच्या “आशो’ला नकार दिला होता. आता हे दोन्ही चित्रपट हातातून गेले असल्याने आलिया दु:खी असल्याची माहिती तिच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.
आलियाने आपल्या वेळापत्रकातील तारखा “इंशाल्लाह’साठी राखून ठेवल्या होत्या. तिला याचदरम्यान आमिर खानच्या “आशो’ चित्रपटाबद्दल विचारण्यात आले होते. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे तिच्याजवळ “आशो’साठी वेळ नव्हता. त्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला होता.
मात्र, चित्रीकरण सुरु व्हायच्या दोन दिवस आधीच ‘इंशाल्लाह’चे पूर्ण काम थांबवण्यात आले असून तूर्त हा चित्रपट करण्याचा कोणताही विचार नसल्याचे भन्साळीच्या निर्माता संस्थेने स्पष्ट केलं आहे. अचानक दोन्ही चित्रपट हातातून निघून गेल्याने आलियाचे चांगलेच नुक्सान झाले असल्याचे बोलले जात आहे.