– राजेंद्र वारघडे
पाबळ येथील तरुणांकडून मदत मिळाल्याने आंबेवाडीत पूरग्रस्त गहिरवले
पाबळ -“या अन्नाची आस तुम्हाला काय सांगू?, असे म्हणत पूरग्रस्त महिलेला हुंदका फुटला. डोळ्याच्या कडा ओलावल्या. हे पाहून कार्यकर्त्यांसह पत्रकारांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यानंतर इतर महिलाही हुंदके देऊ लागल्या. त्यामुळे थोडावेळ वातावरण भावनिक झाले. गेल्या दहा दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी अडीचशे किलोमीटवरून सर्व साहित्यांसह दोन घास गरम अन्नाचे हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेवाडी (ता. करवीर) येथे राबविला. मदतीचे हात राबले. मात्र, त्याच हाताना मायेचा ओलावा होता.
येथील पाच ते सहा सरळ उभ्या गल्लीत कुटुंबे राहतात. हे कुटुंब टिचभर पोटापाण्यासाठी दिवसभर हातभराची लढाई करतात. मोलमजुरी हीच त्यांची दिवसभराची संपत्ती. दिवसभर काबाडकष्ट करून कुटुंबाला दोन घास पुरवताना चार कच्ची बच्ची मुले, सर्व जाती धर्माचे. काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरण्यातच त्यांची एक पिढी खपून गेली आहे. पंचगंगेला आलेल्या महापुरात त्यांचे संसार कोलमडून पडले. ऐनवेळी जीवरक्षक दलाच्या बोटींनी त्यांना सुरक्षित बाहेर काढून जवळच असलेल्या सोनतळी गावातील शाळेत हलवले, ना पाहुणे ना नातेवाईक. कोणताच आधार नसलेले वास्तवात निराधारच होते. महापूर ओसरल्यानंतर ही पन्नास ते साठ कुटुंबे क्षणार्धात उघड्यावर पडली.
महापुरात त्यांचे सर्वस्वच वाहून गेले होते. त्यांना सावरण्यासाठी प्रशासन थोडेफार बधीर झाले होते. घर सावरण्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यात पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा होता. सोनतली गावातून भल्या सकाळी आंबेवाडीत यायचं. घराची स्वच्छता करायची, हाच त्यांचा दिनक्रम राहिला होता. हाताला लागतील ती गाडगी मडकी ढिगाऱ्यातून बाहेर काढायची. उभी आडवी लाकडे, तुळ्या बाजूला सारायच्या. चिखलातून एकेक कपडा बाहेर काढायचा. त्याला ऊन दाखवून सुकावायचे. भुकेची कळ यायची, मात्र, चूलच नाही. पेटवायच तरी काय ही परिस्थिती होती. मदत घेऊन येणाऱ्या गाड्या डोळ्यासमोरून पुढच्या गावाला जाताना दिसत होत्या. एखादा बिस्किटाच्या तुकडा मिळतोय का ते पहायचं. मात्र, थांबत नाही, हे पाहून आसवे गिळायची. पुन्हा कामाला लागायचं.
पोट खपाटीला गेल्याने त्यांना दोन घासाची आस होती. त्याचवेळी पाबळच्या बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानची रुग्णवाहिका उभी राहिली. स्वच्छ पातेल्यात गरम गरम अन्न घेऊन आलेली, भात वरण, भाजी आणि गोड शिरा घेऊन आली होती. क्षणार्धात मिळेल त्या भांड्यासह गराडा पडला. दोनशे किलो शिजवलेले खाद्याचे वाटप करण्यात आले. त्यातील शेवटी आलेल्या एका महिलेला जेवण दिले. सहज पत्रकाराने प्रश्न विचारला, ताई, पोटभर दिले जातेय का, या प्रश्नांने ती माऊली गहिवरली. सरळ वाढलेल्या ताटाकडे पाहत म्हणाली. या अन्नाची आस काय सांगू,….ती आज आमाला कळली. तुम्ही देवदूतासारखे धावून आलायं. जिथं शिळ्या तुकड्याची मारामार. तिथं ताजे अन्न देता, हे उपकार आयुष्यभर फिटणार नाही भाऊ, असे म्हणून ही महिला एका दमात हुंदका देत बोलली. मात्र, त्यावेळी सर्वजण गहिवरले. महापुराच्या जलप्रलयात माणुसकीची प्रचिती पाबळकरांनी महाराष्ट्राला दाखवून दिली.