30 ऑगस्टला जिल्हा परिषदेवर शिक्षकांचा मोर्चा
नगर – कोपरगाव तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कोणतीच भूमिका न घेता सोयीस्कर मौन घेतल्याचा आरोप करत संबंधीत गटशिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने दि.30 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या जाचाला कंटाळून तालुक्यातील दोन गुरूजींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिक्षकांच्या समन्वय समितीने केला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दहा दिवसापूर्वी निवेदन दिले.मात्र यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.काल शिक्षण समितीची सभा झाली.यात समितीच्या काही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.मात्र यावर काहीच बोलण्यास शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.
कोपरगावमध्ये आज गुरुजींचा आक्रोश मेळावा
कोपरगाव तालुक्यातील दोन शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही कोपरगावचे स्थानिक गुरूजी दबावात होते. जिल्हा शिक्षक समन्वय समितीने याबाबत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर स्थानिक तालुका पातळीवरील सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येत त्यांनी या प्रश्नावर आवाज उठविण्याचे धाडस केले.
शिक्षण विभाग यावर कोणतीच कार्यवाही करत नसल्याने आता जिल्हा परिषदेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाच्या तयारीसाठी शनिवारी दि.24 दुपारी एक वाजता कोपरगावमध्ये व्यापारी धर्मशाळेत आक्रोश मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्हा पातळीवरील शिक्षक संघटनेचे नेते रा.या.औटी,आबासाहेब जगताप,बापू तांबे,संजय कळमकर,राजेंद्र निमसे,राजेंद्र शिंदे आदी या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.