वाई – वाई तालुक्यातील बावधनसह बारा वाड्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या महापुरात सर्वसामान्यांची घरे, शेती, विहिरी, जनावरे, पिकांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनदरबारी प्रस्ताव पाठविण्यात यावेत. नुकसानग्रस्तांपर्यंत जास्तीजास्त शासकीय मदत मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी पाहणी दरम्यान काढले.
आमदार मकरंद पाटील यांनी वाई विधानसभा मतदार संघ पिंजून काढला असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. बावधनसह परिसराची पहाणी आमदारांनी केली असून या परिसरातील शेतीचे, रस्त्याचे, घरांचे, विहिरी यांची जवळपास पन्नास लाखांचे नुकसान झाले असून त्याची पाहणी करून नुकसानग्रस्त कुटुंबासाठी जास्तीत-जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी दिले.
यावेळी सूतगिरणी चेरमन शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, माजी उपसभापती मदन भोसले, बाजार समिती माजी संचालक राजेंद्र कदम, अंकुश कुंभार, राष्ट्रवादी उपजिल्हाअध्यक्ष नितीन मांढरे, सरपंच संतोष भोसले उपसरपंच तानाजी कचरे, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास पिसाळ, माजी सरपंच सतीश पिसाळ, भैरव देवस्थान अध्यक्ष अजित पिसाळ, खरेदी विक्री संघ संचालक हरिदास राजपुरे, नागेवाडी सरपंच मंगल बनसोडे, उपसरपंच सुरेश सणस, साहेबराव सणस, अशोक जाधव, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कांबळे, सदाशिव ननावरे, रामचंद्र कुंभार, हनुमंत कदम, अजित पिसाळ, सुनील चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मकरंद पाटील यांनी अनपट वाडीतील पुलाच्या नुकसानीची पाहणी केली, कनूर मधील खचलेल्या रस्त्याची, नागेवाडीत शेतीचे, घरांचे व रस्त्याची पहाणी केली, तसेच दरेवाडीमध्ये नागेवाडी धरणाच्या पोटपाटाचे झालेल्या नुकसानीची पहाणी करीत बावधनसह परिसरातील नुकसान शेतकरी कुटुंबांना शासनाची जास्तीत-जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.