कराड – मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवस पिके पाण्याखाली राहिल्याने पिके कुजली आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत. हे सरकार शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.
नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी मंत्री अनिल बोंडे कराड तालुक्यातील मालखेड येथे आले असता त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कृषी संचालक एन. टी. शिसोदे, कोल्हापूर विभागीय कृषी अधिक्षक उमेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार अमरदीप वाकडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर, सांगलीचे कृषी अधिक्षक राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हाणी ना. बोंडे यांच्याजवळ मांडली. जेवढ्या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या सर्व पिकांचे पंचनामे करावे, पिके पुर्णतः वाया गेली असून शेतकऱ्यांपुढे मोठी आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. पिकेही नाहीत आणि कर्जही अंगावर अशी स्थिती झाली आहे. शिवारातील पिके काढण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.
जे धान्य काढले होते, घरात होते तेही भिजून नुकसान झाले आहे. अनेकांचे विद्युत पंप वाहिले आहेत. अनेकांच्या जमीनी पाण्याबरोबर वाहिल्या आहेत. त्याचबरोबर ठिंबकसंचाचीही मोडतोड झाली आहे. त्याचा विचार करुन शासनाने कर्जमाफी करावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मंत्री अनिल बोंडे पुढे म्हणाले, महापुराने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या असलेले पिक हाताला लागणार नाही. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके आठ-आठ दिवस पाण्याखाली राहिल्याने ती कुजली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शासनास सादर करावेत. शेतकऱ्यांना जुन्या दराऐवजी प्रचलीत दराप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. वाढता खर्च आणि झालेले नुकसान याचा विचार करुन शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त भरपाई देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य ती मदत देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याअनुषंगाने पूरबाधित भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.