सातारा – पावसाने विश्रांती घेतल्याने कास पठाराचा हंगाम सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. कास पर्यटनाच्या आरंभाचे सूतोवाच सातारा वन विभागाने केले आहे. मात्र रानफुलाच्या काही प्रजाती यंदा बघायला मिळणार नाहीत असे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
यंदा पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन अस्तव्यस्त करून टाकले. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सरासरीपेक्षा अधिक एकशे दहा टक्के पाऊस अधिक झाला. जावली तालुक्यात आणि तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या कास परिसरात 27 जुलै ते 18 ऑगस्ट या तीन आठवड्यात सरासरी 45 ते 55 मिलीमीटर म्हणजेच दिवसाला अडीच इंच पावसाची नोंद झाल्याचे वृत्त आहे. अतिवृष्टीमुळे कास परिसराला भूस्खलनाचा मोठा फटका बसला. या अतिवृष्टीचा कास पठारावर उमलणाऱ्या हंगामालाही मोठा फटका बसला आहे.
ऑगस्ट महिन्यांच्या शेवटी फुलांचा बहर येण्यास सुरुवात होते. निळ्या गेंदाची फुले, सीता आसव, कापरू, तेरडा, हिरवी निसुरडी, इ. फुले पठारावर आणि कुमुदिनी तळ्याच्या आसपास उमलल्यानंतर सारे पठार रंगीबेरंगी फुलांनी झळाळते. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून पावसानेसुध्दा उघडीप घेतली आहे. घाटाई रस्ता ते कुमुदिनी तळे या मार्गाकडून फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी कास पठाराला 80 हजार ते एक लाख पर्यटक भेट देतात. कास पठारावर अजूनही पावसाची रिमझिम सुरूच आहे.
साधारण पुढील आठवड्यात पाऊस कमी झाल्यावर फुलांचा हंगाम गृहित धरून वनविभागाने हंगामाची तयारी सुरू केल्याचे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. परदेशी यांनी दिली आहे. ऑनलाईन बुकिंग करून येणाऱ्या तीन हजार पर्यटकांनाच पठारावर प्रवेश देण्यात येणार आहे.