चाकणमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अवैध प्रवासी रिक्षांना लावले जॅमर
चाकण – पर्यावरण संरक्षण नावाने सुरू झालेल्या सीएनजी रिक्षा अवैध प्रवासी वाहतुकीच्या बेशिस्तपणामुळे पुणे-नाशिक महामार्गावर मोशी चौक, चिंबळी, मोई फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक येथे वाहतूककोंडीत प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत अनेकवेळा आवाज उठवण्यात आला; मात्र चाकण वाहतूक शाखेला जाग येत नव्हती;परंतु मंगळवारी (दि. 13) अचानक या वाहतूक शाखेला जाग आली अन् वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या तीन आसनी रिक्षांना तळेगाव चौकात जॅमर लावण्यात आले. यात 6 रिक्षांना जॅमर लाऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. चाकण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप कोंडे-देशमुख आणि रणजित बनसोडे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
भोसरी ते चाकण दरम्यानची सहा सीटर प्रवासी वाहतूक जुलै 2018 नंतर बंद झाली, आणि त्या वाहतुकीची जागा “सीएनजी’वर चालणाऱ्या तीनचाकी रिक्षाने घेतली. या सहासीटर रिक्षा प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावर कोठेही वाहतुकीची नियम न पाळता उभ्या केल्या जात होत्या, त्यामुळे चाकण तळेगाव व आंबेठाण चौक येथे कृत्रिम वाहतूककोंडी निर्माण व्हायची याबाबत आमदार सुरेश गोरे, कार्यकर्ते यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांना पळता भुई थोडी केली होती. त्यानंतर सहा सीटर रिक्षा भोसरी, चाकण परिसरातुन हद्दपार झाल्या, त्या दरम्यान, चाकण ते भोसरी प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला; मात्र यासाठी पीएमपी अथवा एसटीने प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची प्रवास वाहतुकीची तत्परता दाखविली नाही. याच संधीचा फायदा पुन्हा एकदा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी करून घेतला आणि पाहता पाहता सीएनजीवर चालणाऱ्या असंख्य रिक्षा भोसरी ते चाकण धावू लागल्या. यातील बहुतांश रिक्षा चालकांकडे परवाना नसल्याचे दिसून आले आहे याबाबत वाहतूक शाखा काणाडोळा करत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
आतापर्यंत 27 हजार 800 रुपये दंड वसूल
चाकण परिसरात वाहतूक नियम मोडणाऱ्या 311 वाहनांवर मंगळवारी (दि. 13) कारवाई करण्यात आली. तर 356 खटले दाखल करण्यात आले, त्यांच्याकडून 9 हजार 200 तर आतापर्यंत एकूण 27 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर आज केलेल्या कारवाईतील 82 हजार 600 दंड वसूल होणे बाकी आहे.
वाहतूक नियमांची “ऐशी की तैशी’
प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी रिक्षा चालकांना वाहतूक नियमाचे काही देणेघेणे नाही, प्रवासी मिळविण्यासाठी त्यांची जणू शर्यतच सुरू असते, तसेच तीनपेक्षा अधिक प्रवासी कोंबून धोकादायक वाहतूक केली जाते. यामध्ये सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाशी त्यांना सोयरसुतक नाही. बहुतांशी रिक्षामालकांनी रिक्षा घेऊन त्या परवाना नसलेल्या चालकांना बिनधास्तपणे “शिप’वर चालविण्यासाठी दिल्या आहेत. तर वाहतूक शाखा याकडे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
रुंदीकरण रेंगाळल्याने वाहतूककोंडी नित्याचीच
चाकण औद्योगिक वसाहतीमधील सायंकाळी कंपन्यांच्या सुट्टीच्या वेळी नेहमीच होणाऱ्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातही या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. चाकण भागातील महामार्गावरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने आणि रस्त्याच्या रुंदीकरणांची कामे रेंगाळलेली असल्याने या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.
तीन चाकी रिक्षांना वाहतूक परवाना पुणे जिल्ह्यासाठी आहे. रोज दंडात्मक कारवाई सुरू आहे. परवाना, ड्रेस, बॅज नसेल तर दंड आहे. एकूण किती रिक्षा भोसरी चाकण दरम्यान धावतात याबाबत संख्या माहिती नाही. परवानाधारक रिक्षा आहेत, सप्टेंबर 2018 ते एप्रिल अखेर 26 लाख 35 हजार 900 रुपये दंड वसुली झाली आहे. जानेवारी ते 15 मे पर्यंत 20 ते 25 हजार रुपये अंदाजे दंड वसुली ई-चलनाद्वारे होत आहे.
– दिलीप कोंडे-देशमुख, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, चाकण