पुणे -जम्मू-काश्मीरमधील सद्य स्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही कसून तपासणी केली जात असल्याने प्रवाशांनी विमान उड्डाणापूर्वी किमान 3 तास अगोदर पोहचण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.
ब्युरो ऑफ सिव्हील ऍव्हिएशन सिक्युरिटीने (बीसीएएस) देशभरातील सर्व विमानतळांना “हाय अलर्ट’ दिला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली जाते. मात्र, यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करण्यात आल्याने तणावाची स्थिती आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ) कडून प्रवाशांसह विमानांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी दलाच्या जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे. विमानांमध्येही प्रवाशांची कसून तपासणी करण्याच्या सूचना विमान कंपन्यांना दिल्याचे प्रशासनाने कळविले आहे.