11 मोऱ्यांद्वारे 4 हजार क्सुसेक वेगाने पाणी सोडले
राहुरी – मुळा धरणातून आज मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे मुळा धरणातून 11 मोऱ्याद्वारे 4 हजार क्युसेकने पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले. नगर शहरासह राहुरी, नेवासा, पाथर्डी तालुक्यासाठी महत्त्वाचे असलेल्या मुळा धरणात सद्यस्थितीत आवक 14 हजार 800 क्युसेक आहे. सुरुवातीला चार हजार क्युसेक प्रवाहाने नदी पात्रामध्ये पाणी सोडणार असून विसर्ग नंतर वाढविला जाईल. भंडारदरा, निळवंडे धरण भरल्यानंतर धरणातून प्रवरा नदी पात्रात याआधीच पाणी सोडले आहे. मुळा धरण परीचालनानुसार 15 ऑगस्ट पूर्वी धरणात 23 हजार 451 दशलक्ष घनफुट पाणीसाठा ठेवता येतो. त्यापूर्वीच पाणीसाठा तेवढा झाल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले.
आमदार शिवाजी कर्डिले यांचे हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले. अकरा दरवाजातून चार हजार क्युसेक पाणी सोडले गेले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, कारखाना संचालक रवींद्र म्हसे, सुरसिंगराव पवार, उत्तमराव म्हसे, अतीक बागवान आदी कार्यकर्ते हजर होते. टंचाई निधीतून वांबोरी पाईपलाईनचारीचे थकीत वीजबील एक कोटी वीस लाखापैकी पन्नास टक्के रक्कम साठ लाख रुपये शासनाने मंजूर केली असून चार दिवसात वांबोरी चारी व भागडा पाईपलाईनचारी साठी पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार शिवाजी कर्डिलेंनी यावेळी दिली. दरम्यान तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी मुळा नदी पात्रालगतच्या शेतकरी व ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले. पाणी सोडण्याची पूर्वसूचना म्हणून भोंगा वाजविला गेला.