तक्रार करुनही शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
ओंकार दळवी
जामखेड – बाबा, मी आता शाळेत जाणार नाही. मला शाळेच्या भींती अंगावर पडण्याची भीती वाटते. हे हृदय हेलावणारे बोल आहेत जामखेड शहरातील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे. शहरात नगरपरिषद हद्दीत जिल्हा परिषदेच्या सहा शाळा असून, एक हजार 670 विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व शाळांच्या इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. मात्र पालकांनी वारंवार तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता चिमुकलेच या धोकादायक शाळेत बसण्यास नकार देत आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे शहरासह तालुक्यातील धोकादायक शाळा इमारतांचा अहवाल पाठवूनही त्याची दखल घेऊन त्या दुरुस्त केल्या जात नाहीत. शासन एकीकडे शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. मात्र पायाभूत सुविधाच नसल्याने गुणवत्ता ढासळत आहे. काही शाळांतील शिक्षकांना अपुऱ्या वर्गखोल्यांमुळे दोन इयत्तांतील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून शिकवावे लागत आहे. शिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक शाळा खोल्यांना तडे गेले आहेत. सध्या या शाळा खोल्यांना गळती लागली आहे.
शिक्षकांनी खटाटोप करून शाळा डिजिटल करीत असल्याने पाटीवर गणिते सोडवणारे विद्यार्थी आता भल्या मोठ्या स्क्रीनवर सोडवत आहेत. कविता, गाणी, कथा शिक्षकांच्या तोंडून ऐकण्याऐवजी पडद्यावर दिसू लागल्या आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत चांगले शिक्षण झेडपी शाळेत मिळू लागल्याने पटसंख्या व गुणवत्ता देखील वाढीस लागलेली आहे. धोकादायक वर्ग खोल्यांमुळे डिजिटल संकल्पनेला तडा गेला आहे.
पडक्या भिंती, गळके छते, वर्गात येणारे पाणी, खिडक्यांची दुरवस्था, फाटलेले पत्रे, अशी बिकट अवस्था जिल्हा परिषद शाळांतील वर्ग खोल्यांची आहे. जामखेड शहरातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असले, तरी शहरातील जिल्हा परिषदेच्या सहा शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे एक हजार 670 विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट बिकट झाली आहे.
काही शाळा खोल्यांचे बांधकाम चुना, वाळू, 45 वर्षापूर्वी करण्यात आलेले आहे, असे जाणकार सांगतात. पावसाळ्यात या धोकादायक इमारतीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले, तरी इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी यंदा वर्गच झालेला नाही. त्यामुळे मोडकळीस आलेल्या या जुनाट इमारतीत विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालूनच शिक्षण घ्यावे लागत आहे.
जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुले व मुलींची शाळा येथे वादळाने सहा वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात शाळेचे नुकसान झाले होते. आता या शाळेतील एकूण 800 मुले व मुली शिक्षण घेत आहेत. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नव्हती. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते, त्यामुळे शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांतून होत आहे.
मुलाला शाळेत जाण्याची भीती वाटते. या शाळेची इमारत जीर्ण झाल्याने मुलगा बाबा, मी शाळेत जाणार नाही, मला शाळा पडण्याची भीती वाटते, असे सांगत आहे. त्यामुळे मुलगा शाळेतून घरी येईपर्यंत आम्हाला देखील काळजी वाटते.
राजेंद्र पवार ,पालकधोकादायक इमारतींचे प्रस्ताव सादर झाले असून, पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जि. प. बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांकडून संबंधित धोकादायक इमारतीचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येईल. तसेच जामखेड शहरातील मुलीच्या शाळेतील 6 खोल्या पाडण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. शिवाय नादुरुस्त शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीनुसार आराखडा तयार करण्यात येईल.
कांतिलाल ढवळे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी
चांगले व मोफत शिक्षण मिळते म्हणून मुलाचे नाव जिल्हा परिषद शाळेत दाखल केले. मात्र येथे जर मुलाचा जीव धोक्यात येत असेल, तर अशा शाळेत पाठवून काय फायदा.
नवनाथ जाधव ,पालक