भाजपचा मेळावा : सहकारमंत्री देशमुख यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पिंपरी –“”आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या दृष्टीने तयारीला लागा. विधानसभा निवडणुकीत 220 जागांवर मिळवायचा आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी सर्व 288 विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याच्या जिद्दीने कामाला लागावे. येणारा काळ हा भाजपचा सुवर्णकाळ असणार आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत पक्षाने आखून दिलेले कार्यक्रम कार्यकर्त्यांनी राबवावेत. जनतेत मिसळून काम केल्यास निवडणुकीत आपला विजय नक्की आहे”, असा विश्वास सहकारमंत्री व पुणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी सुभाष देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केला.
वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा झाला.या मेळाव्यात मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, कामगार राज्यमंत्री व शहर प्रभारी बाळा भेगडे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उमा खापरे, शहर संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.
हाळवणकर यांनी संघटनात्मक बैठक घेतली. सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. तत्पूर्वी, त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि शक्तीकेंद्र प्रमुखांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या सूचनांचा पक्ष पातळीवर निश्चित विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. पिंपरी-चिंचवडमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किमान तीन लाख राख्या पाठविल्या गेल्या पाहिजे.एकूण 13 विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्याचा चंग बांधूनच जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.