प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी : वाहतूक कोंडीवर उपाययोजना
लोणावळा – लोणावळा शहर व बाजारपेठेतील वाहतुकीची समस्या सोडविण्याकरिता शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पूल दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर एकेरी मार्ग (“वन वे’) सुरु करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून लोणावळा शहर पोलीस नागरिकांना या “वन वे’ संदर्भात आव्हान करत होते. अखेर सोमवारपासून प्रायोगिक तत्त्वावर हा “वन वे’ सुरू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करताना येणारे अडथळे व त्यावरील उपाययोजना यांची सांगड घालत पुढील काही दिवसात हा “वन वे’ नियमीत सुरु करण्यात येणार आहे. शिवाजी महाराज चौक येथून भांगरवाडीकडे जाणारी सर्व वाहने ही मुख्य बाजार पेठेतील रस्त्याने सोडण्यात येणार असून भांगरवाडी मार्गे बाजारपेठेत येणारी वाहने इंद्रायणी पुलावरून पुरंदरे शाळा, शाळा क्रमांक एक येथून पोलीस स्टेशनसमोरून पुन्हा शिवाजी चौकात आणण्यात येणार आहे.
लोणावळा नगर परिषदेने सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील काही “वन वे’, काही ठिकाणी “पार्किंग’, “नो पार्किंग’, “नो हॉल्टिंग’ करण्याबाबत ठराव करण्यात आला आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर या ठरावानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक निखील कवीश्वर यांनी वारंवार केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगरसेवक देवीदास कडू, निखील कविश्वर, मनसेचे शहराध्यक्ष भारत चिकणे, लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी खाडे यांनी आज (बुधवारी) या “वन वे’ मार्गाची पाहणी करत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. कॉंग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर यांनी देखील नागरिकांना “वन वे’चा स्वीकार करा, असे आवाहन केले आहे.