पिंपरी – जैन समाजाच्या चातुर्मासाला धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात झाली. त्यानिमित्त शहरातील विविध जैन स्थानकांमध्ये गुरू महाराजांचे प्रवचन, मंगलपाठ आदी कार्यक्रम झाले. त्याला जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात उपाध्याय प्रवर रवींद्रमुनीजी म.सा. यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “”व्यक्तीच्या जीवनामध्ये सत्संग असणे आवश्यक आहे. अयोग्य व्यक्तींची संगत पकडल्यास आपली जीवनातील वाटचाल ही चुकीच्या दिशेने सुरू होते. साधूंचे काम आहे की त्यांनी “बहुजनहिताय, बहुजनसुखाय’ या उद्देशाने काम करावे.”
आकुर्डीतील जैन स्थानकात उपप्रवर्तिनी कंचनकंवरजी म.सा. यांचे प्रवचन झाले. त्या म्हणाल्या, “”आपल्यातील अहंकार सोडून आपण ईश्वराच्या निकट जाण्यावर भर द्यायला हवा. ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि तप यांचा महोत्सव म्हणजे चातुर्मास होय.” साध्वी दिव्ययशाजी, अणिमाश्रीजी यांचेही प्रवचन झाले. मीराबाई लुणिया यांच्या 515 आयंबिलची पचक्खावणी करण्यात आली. संघाचे अध्यक्ष संतोष कर्नावट, उपाध्यक्ष सुभाष ललवाणी, राजेंद्र खिंवसरा, सूर्यकांत मुथियान, मोतीलाल चोरडीया तसेच सुशिल बहू मंडळ, चंदनबाला महिला मंडळाचे पदाधिकारी
उपस्थित होते.
कासारवाडी येथील प्यारीबाई पगारिया सभागृहात साध्वी जिनेश्वराजी यांचे प्रवचन झाले. साध्वी दर्शनप्रभाजी व अन्य पाच साध्वीजींनी महामांगलिक दिले. साध्वी जिनेश्वराजी म्हणाल्या, “”चातुर्मासातील चार महिन्यांच्या काळामध्ये आराधना केल्यास आनंदाची अनुभूती मिळते. हा काळ आपण धर्मसाधनेत घालविणे आवश्यक आहे.” भोसरी जैन श्रावक संघाचे सुभाष चुत्तर, जवाहरलाल भंडारी, कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष संदीप फुलफगर, महामंत्री श्रेयस पगारिया, स्वागताध्यक्ष विलास पगारिया, महिला अध्यक्षा दीपा भंडारी आदी उपस्थित होते.
चिंचवडस्टेशन येथील जैन स्थानकात साध्वी अमितज्योतीजी म.सा. म्हणाल्या, “”चातुर्मास काळात जैन भाविकांनी विविध जप, तप, साधना आणि त्याग करण्याचा संकल्प करायला हवा. ”