वाई – धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी अजूनही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. वाई तालुक्यात 40 टक्केच पेरणीची कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणी पिकांची उगवण चांगली झाली आहे. वाई, पाचगणी, महाबळेश्वरला पावसाची थोडी रिपरिप चालू असली तरीही संपूर्ण तालुका दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तालुक्यात सध्या ज्या प्रमाणात पाऊस पडला आहे. तो फक्त पेरणीसाठी अतिशय उपयुक्त ठरला असून धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यासाठी चांगल्या पावसाची नितांत गरज आहे.
मृग नक्षत्र चांगल्या प्रकारे पडेल अशी अपेक्षा असताना तसे वातावरण निर्माण असतानाही पावसाने दडी मारली. तालुक्यातील सर्व प्रकारचे बंधारे, तलाव तसेच बलकवडी, नागेवाडीव, धोम धरणात पाण्याचा पुरेसा साठा वाढण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. वाईच्या पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरीही पूर्व भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे या भागातील बळीराजा चिंताग्रस्त आहे. वाईच्या पश्चिम भागातील पावसाला जोर असल्याने भात पिकाची लागवड थोड्याच दिवसात पूर्ण होवू शकते. गेल्या वर्षी नऊ जुलैला कृष्णा नदीला पूर आला होता. परंतु आजमितीला कृष्णा नदीची अवस्था अतिशय बिकट झाली असून नदीत घाणीचे साम्राज्य आहे. तिन्ही धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्यास पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.