-माधव विद्वांस
नाट्यअभिनेते, लोकनाट्यकार, खलनायक, चरित्रनायक आणि सामाजिक कार्यकर्ते निळू फुले यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ कृष्णाजी फुले, पण ते निळूभाऊ व निळू फुले म्हणूनच ओळखले जात होते. त्यांचा जन्म 25 जुलै 1931 रोजी पुणे येथे झाला. अत्यंत सामान्य कुंटुंबात जन्मलेले फुले अभिनय आणि सेवादल यामुळे प्रसिद्ध झाले.
त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. त्यांचे वडिलांनी भाजी विकून आपल्या मुलाचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत केले. तसेच उद्यानविषयक पदविकाही मिळवली. त्यांना रोपवाटिका सुरू करायची होती, परंतु भांडवलाअभावी हा विचार त्यांनी सोडून दिला. सुरुवातीला त्यांनी पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या उद्यानात माळी म्हणून काम केले.
सामाजिक बांधिलकीमुळे त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला. स्वतःच्या 80 रुपये पगारातील दहा रुपये ते दरमहा राष्ट्रसेवा दलाच्या कार्यासाठी देत असत. याचवेळी वसंत बापट, पु. ल. देशपांडे या दिग्गजांशी त्यांचा संपर्क आला व राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कलागुणाला येथेच पहिल्यांदा वाव मिळाला.त्यांना वाचनाची आवड होतीच. सेवादलातील सहभागामुळे ती अधिक वृद्धिंगत झाली.
रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यांनी लेखनही सुरू केले व “उद्यान’ हे नाटक लिहिले तसेच राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकासाठी “येरा गबाळ्याचे काम नोहे’ हा वग लिहिला. याच लोकनाट्याच्या माध्यमातून त्यांच्यातील अभिनेताही लोकांना दिसून आला. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या पुढारी पाहिजे या नाटकातील “रोंगे’ची भूमिका साकारून त्यांनी नाट्यक्षेत्राचे लक्ष वेधून घेतले.कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते अभिनेते म्हणून पुढे आले.
या नाटकातील भूमिकेमुळे दिग्दर्शक अनंत माने यांनी वर्ष 1968 मध्ये “एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटासाठी निळू फुले यांची निवड केली. “झेले अण्णा’ या विनोदी खलनायकाची भूमिका त्यांनी साकारली व रूपेरी पडद्यावर छाप टाकली. त्यांच्या किंचित घोगऱ्या आवाजाचा व भेदक नजर, कावेबाजपणा दाखवणारी देहबोली याचा त्यांनी उपयोग करून सुंदर शब्दफेक करून ग्रामीण ढंगातील चित्रपटात एक स्थान निर्माण केले. सामना चित्रपटातील “हिंदुराव धोंडे पाटील’ही खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली.
निळूभाऊंनी आपल्या 40 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत 140 हून अधिक मराठी चित्रपटांमधून व 12 हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या. रंगभूमीवरही विविध प्रकारच्या भूमिकेतून रसिकांची माने जिंकली. विजय तेंडुलकर लिखित “सखाराम बाईंडर’ या नाटकातली त्यांची खलनायकी ढंगाच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी व समीक्षकांनीही कौतुक केले.
अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत, सत्यशोधक चळवळ, दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य यांचेशी त्यांचा सक्रिय सहभाग होता. दरम्यान “सूनबाई, घर तुझंच आहे’ या नाटकात त्यांना रजनी मुथा भेटल्या आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. निळू फुले यांचे पुणे येथे अन्ननलिकेच्या कर्करोगाने 13 जुलै 2009 रोजी निधन झाले. निळूभाऊंना अभिवादन.