पुणे – बीड जिल्ह्यातील उसतोड कामगार महिलांचे गर्भाशय काढल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी नियमावली तयार केली जाणार आहे, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“गर्भाशय शस्त्रक्रिया चौकशी समितीची दुसरी बैठक मंगळवारी विधानभवन येथे झाली. त्यानंतर गोऱ्हे बोलत होत्या. “ऊसतोड कामगार महिलांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ज्या महिलांची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांची इन कॅमेरा मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसेच साडेचार लाख महिलांची भेट घेऊन त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीतून निष्कर्ष काढला जाणार आहे.
गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते, की केवळ पैसे उकळण्यासाठी या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, याचा शोध समिती घेणार आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया परवानगी शिवाय करता येत नाही. तर शेजारील जिल्ह्यातील रुग्णालायांवर लक्ष ठेवण्यात आले आहे,’ असे गोऱ्हे यांनी सांगितले. “महिला कामगारांच्या सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे आवश्यक असून त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या गरज आहे. ऊसतोड महिला कामगारांच्या विविध समस्या जाऊन घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल येत्या 30 जुलैपर्यंत सादर केला जाणार आहे,’ असे गोऱ्हे यांनी सांगितले.