मुंबई – गेल्या आठवड्यात मुंबईची त्रेधा तिरपिट उडवून देणारा पाऊस आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये परतला आणि रस्ते, रेल्वे वाहतुकीचा पुन्हा एकदा बोजवारा उडाला. गेल्या आठवड्यात सार्वजनिक वाहतुकीबरोबरच विमानतळावरील व्यवहारांवरही यामुळे विपरीत परिणाम झाला होता. रस्त्यांवर पाणी साचलेले असल्यामुळे सकाळी ऑफिसला जायल निघालेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. मुंबई महानगर आणि आजूबाजूंच्या उपनगरांमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यांमधील काही ठिकाणी तसेच ठाणे जिल्ह्यातल्या काही ठिकाणीही जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
बाईक गेली मॅनहोलमध्ये…
मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचे व्हिडीओ व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात चेंबूरमधील एका व्हिडीओत उघड्या मॅनहोलमध्ये एक बाईक अख्खी वाहून जातानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. मुंबईमध्ये आगामी काळात आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होतो आहे. जून आणि जुलै महिन्यात सलग चार दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज आहे.
मुंबईच्या विमानतळावरील वाहतुक यंत्रणा आज सकाळी पावसामुळे थोड्यावेळासाठी विस्कळीत झाली होती. यामुळे विमान कंपन्यांनी तीन विमाने अन्यत्र वळवली, असे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईवरून निघणाऱ्या कोणत्याही विमानाचे उड्डाण रद्द झाले नाही, हेही स्पष्ट करण्यात आले. मुंबई विमानतळावरील धावपट्टी सुमारे 20 मिनिटे बंद होती.
मध्यरेल्वेच्या चारही मार्गांवरील वाहतुक सुरळीत सुरू होती. मुंबईच्या उपनगरांमध्ये सकाळपासून केवळ तीन तासात 20 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे घाटकोपर, कान्जुरमार्ग, सायन आणि अन्य स्थानकांच्या मार्गांवर पाणी साचले. त्यामुळे सेंट्रल लाईनच्या लोकल धीम्या गतीने धावत होत्या. नागरिकांच्या गैरसोयीबद्दल महानगर पालिकेने ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी उपसून काढण्यात येईल, असेही मनपाने म्हटले आहे.