मुंबई – मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज राखून ठेवला. काहीं सामाजिक कार्यकर्ते आणि त्या भागातील मच्छिमारांच्यावतीने ही आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या एप्रिल महिन्यातच या प्रकल्पाचे काम थांबवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला होता. त्यावर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला चालू काम सुरू ठेवण्यास अनुमती दिली पण नवीन काम करण्यास मनाई केली.
या याचिकांवर अंतिम सुनावणी घेऊन त्वरीत निकाल द्यावा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार हायकोर्टात ही सुनावणी झाली आहे. त्यावरील निकालाचीच आता प्रतिक्षा आहे. या रस्त्यामुळे सागरी पर्यावरणाची हानी होईल व सागरी जलचरांच्या वास्तव्यावरही विपरीत परिणाम होईल असा याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. तथापी या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरीसह सर्व परवानग्या मिळाल्या असून हा प्रकल्प मुंबईतील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे अशी महापालिकेची भूमिका आहे.