प्रभावीपणे मांडले मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न
नारायणगाव – दिल्ली येथील संसद भवनात सुरू असलेल्या अधिवेशनात खासदारपदाची सोमवारी (दि. 17) शपथ घेतल्यानंतर पहिले भाषण करण्याची संधी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सोमवारी (दि. 24) मिळाली. यावेळी त्यांनी बैलगाडा शर्यती सुरू करणे, राज्यातील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, दुष्काळ, आदिवासी भागात वनऔषधीवर राष्ट्रीय संशोधन केंद्र प्रकल्प, बीएसनएलची सध्याची अवस्था, आरोग्य, लोकसंख्या व रायगडावर राष्ट्रीय स्मारक व्हावे, असे अनेक महत्त्वाचे विषय मांडले.
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीची दुरवस्था झाली आहे. टॉवरचे वीज बिल भरले नसल्याने अनेक टॉवर बंद आहेत. “जिओ और जीने दो’ अशी अवस्था बीएसएनएलची झाली असल्याचा मुद्दा उपस्थित करून बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर डॉ. कोल्हे म्हणाले की, बैलगाडा शर्यतींसाठी ज्या बैलांचा वापर केला जातो, ते खिलार जातीचे देशी वंशाचे बैले आहेत. खिलारी जातीच्या देशी गायींमध्ये दुधाचे प्रमाण कमी असते. तरीही, महाराष्ट्रातील शेतकरी या गायींचे पालन पोषण करतो. या गायींकडून खिलारी जातीच्या बैलांना जन्म दिला जातो. मात्र, सरकारने लादलेल्या बैलगाडा शर्यती बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बैलगाडा शर्यती या मनोरंजनाचे साधन नसून ग्रामीण अर्थ व्यवस्थेतील एक घटक आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी आणणारा बैलगाडा शर्यती खेळाचा प्रकार असल्यामुळे सरकारने ही बंदी उठवावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याने ही बंदी त्वरीत उठवण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी संसदेत केली. तसेच आरोग्याविषयी असलेल्या योजनांची अंमलबजावणी व्हावी, शैक्षणिक क्षेत्रात बदल करणे काळानुसार गरजेचे आहे, लोकसंख्याबाबत जनजागृती करणे, महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याचे मजबुतीकरण करून राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी केली.