सातारा (प्रतिनिधी) – वकील न्यायव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. पत्रकार, डाॅक्टर यांच्यासाठी संरक्षण कायदा करण्यात आला. त्याच धर्तीवर वकील वर्गासाठी संरक्षण कायदा करण्यासाठी संसदेत आवाज उठवून पाठपुरावा करणार आहे. गेली ३५ वर्षे प्रलंबित असलेला कोल्हापूर येथील खंडपीठाचा सर्कीट बेंचचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच विधी क्षेत्रातील मान्यवरांशी आ. शशिकांत शिंदे यांनी संवाद साधून भूमिका जाहीर केली. आ. शिंदे म्हणाले, न्यायदान होताना त्यांचाच पक्षकार असलेल्या आरोपींकडून राहुरी येथील एका वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. हा निंदनीय प्रकार असून त्यामुळे वकील वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वकीलांना कायद्याने संरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्यामार्फत यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यात आले. आंदोलने करण्यात आली. परंतु, सरकारने याकडे दुर्लक्ष केले. कर्नाटक व राजस्थानमध्ये हा कायदा केला असताना महाराष्ट्रात का होत नाही? असा सवाल आ. शशिकांत शिंदे यांनी केला.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ ( सर्किट बेंच) व्हावे या मागणीसाठी बार असोसिएशनचा गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. या लढ्याचे ॲड. धैर्यशील पाटील यांनी नेतृत्व केले या मागणीबाबत राज्य सरकार उदासीन असून याबाबत संसदेत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आ.शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले, जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर विधानसभा, विधानपरिषदेत लक्षवेधी मांडून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत मी ते सोडविले आहेत. केवळ निवडणुकांपुरतेच नव्हे तर पूर्ण वेळ जनसामान्यांच्या प्रश्न व न्याय हक्कासाठी वेळ देणारा तर प्रसंगी लढा उभा करणारा मी कार्यकर्ता आहे.
जिल्ह्यातील विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी मला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, आ. शशिकांत शिंदे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी कार्यालयांत भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.