नवी दिल्ली – आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. पहिल्या सत्रात शपथविधी सुरु असताना राहुल गांधी उपस्थित नव्हते. त्यामुळे राहुल गांधी आहेत कुठे हा सवाल कॉंग्रेस खाजदारांना सतावत असताना राहुल गांधी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सभागृहात पोहोचले आणि पुढच्या अर्ध्या तासात शपथ घेतली.
तत्पूर्वी, 17 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा होताच बाक वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले.
मात्र, पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात राहुल गांधी अनुपस्थित असल्याने संसदेच्या पहिल्याच दिवशी गैरहजर राहिल्याने राहुल गांधींवर भाजपने टीका केली. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, “नव्या लोकसभा अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी हे गैरहजर होते. भारताच्या लोकशाहीबाबत हाच सन्मान आहे का?’ असा सवाल मालवीय यांनी उपस्थित केला होता.
मात्र, यानंतर काही काळात राहुल गांधी यांनी ट्विट करत आपण आज आपल्या लोकसभेतील चौथ्या इनिंगची सुरूवात करणार असुन दुपारच्या सत्रात शपथ घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राहुल गांधी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सभागृहात पोहोचले आणि अर्ध्या तासात त्यांनी खाजदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी शपथ घेतल्यानंतर स्वाक्षरी करण्यास विसरले होते. त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी रजिस्टरवर स्वाक्षरी केली.