पाणीप्रश्न व रखडलेल्या विकासकामांवरून उंबरेची ग्रामसभा गाजली
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना धरले धारेवर
राहुरी – उंबरे ग्रामपंचायतची तहकूब झालेली सभा काल पुन्हा घेण्यात आली. मात्र गावातील पाणीप्रश्न, रखडलेलीे विकास कामे यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत सभा गाजवली. दरम्यान माळवाडी प्रभागाच्या शेकडो महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले व जोपर्यंत आम्हाला पिण्याचे पाणी मिळत नाही तोपर्यंत टाळे काढणार नाही असा पवित्रा घेतला. ग्रामपंचायत कारभाराची चौकशीचा ठराव संमत करण्यात आला. उंबरे ग्रामपंचायतीची काल सकाळी अकरा वाजता हनुमान मंदिरात ग्रामसभा झाली. ग्रामसेवक शेख यांनी जमाखर्चाचे वाचन सुरू करताच ग्रामस्थांनी यास आक्षेप घेतला.
परिसरात स्वच्छता सार्वजानिक आरोग्य आणि पथदिव्यांचा खर्च मंजूर करावा अशी मागणी ग्रामस्थांनी उचलून धरली. त्यावर या बाबींची चौकशी करण्याचा ठराव सर्वसंमत झाला. तसेच सोनई पाणी योजनेचे थकित बिलापोटी एक लाख रुपये भरण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय रस्ते ,गटार, वीज पाणी प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरळीत करता येत नसेल तर राजीनामे द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी गंगाधर ढोकणे, सुनील अडसुरे, भाऊराव ढोकणे, तलाठी अंकुश सोनार, कैलास अडसुरे, गणेश तोरडमल, राहुल ढोकणे, पप्पू ढोकणे आदी उपस्थित होते.
दरम्यान सभा चालू असताना काही पदाधिकाऱ्यांनी ही सभा गुंडाळली. मात्र सभा आटोपती घेतल्यानंतर काही वेळातच माळवाडी प्रभागातील शेकडो महिला सभास्थळी आल्या. त्यांनी आमच्या दलित वस्तीवर जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचे तक्रार केली.तसेच ग्रामपंचायतीला टाळे ठोकत पदाधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले. यावेळेस महिलांचा रुद्रावतार पाहून कर्मचारी व सदस्यांनी काढता पाय घेतला दुपारी उशिरापर्यंत मनधरणी करण्याचे काम सुरू होते.