-नारायण ढेबे
सुनील मारणे हे एक उद्योजक आणि मुळशी तालुक्यातील एक आदर्श शेतकरी. तसे पाहिले तर एक मोठे व्यक्तिमत्त्व, अनेक मंत्री, खासदार, आमदार यांच्या पंक्तीला बसणारा हा उमदा माणूस; पण चेहऱ्यावर जरा देखील मोठेपणाचा अविर्भाव नाही. यांचा मित्रपरिवार फार मोठा. याचे कारण म्हणजे सर्वांबरोबर अतिशय नम्रपणे वागणे, इतरांना मदत करणे, गरिबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे यामुळे समाजात सर्व स्तरात, जातीधर्मात त्यांना मान्यता पावली आहे.
सुनीलशेठ यांचे सावरकरांवर असणारे प्रेम काही वेगळेच. सावरकरांच्या विषयीचे त्यांचे विचार हे प्रखर देशभक्ती सांगणारे आहेत. म्हणून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मारणे सतत प्रयत्न करतात. एका खेड्यातील युवकाने कोणतीही पार्श्वभूमी नसताना सावरकरांसारख्या देशभक्ताचा अभ्यास केला. त्यांचे विचार नवयुवकांपर्यंत पोहोचवावा म्हणून ते सावरकर जयंतीसारखे कार्यक्रम घेतात. देशभक्तीतून सावरकर काय होते हे नव्या पिढीला समजावून सांगणारे मारणे आणि त्यांच्या हाकेला उभे राहणारे त्यांचे मित्र हे एक वेगळे रसायनच बनलेले आहे.
गावाकडे शेती, शेतीमध्ये असणारी उत्तम बैलजोडी, शेतात रमणारा, शेतीशी एकनिष्ठ असणारा, गावाकडे गेल्यानंतर शेतीच्या मातीत मिसळणारा, औत धरून जमिनीची मशागत करणारा, आपल्या पूर्वजांचे शेतीधन जपणारा, बदलत्या काळात शेती हा व्यवसाय म्हणून जोपासणारा हा माणूस कष्ट करून आदर्श शेतकरी बनला. जरी आपण शहरात राहिलो, वागलो तरी आपले गाव न विसरणारा, गावातल्या मातीशी, लोकांशीही नाते अगदी घट्ट ठेवणारा मग ते युवक असोत, मुली, महिला, वयस्कर कोणीही असोत या सर्वांना आपल्या कुटुंबात सामावून घेणारा आणि त्याचबरोबर शेती आणि जेव्हा गावात जातो तेव्हा “गड्या आपला गाव बरा’ असे निखळपणे बोलणारा, आपल्या लहानपणाच्या आठवणीत रमणारा असा हा अवलिया. बदलत्या जगाशी आपण मिळतं जुळतं घेतले पाहिजे. परिस्थितीनुसार आपल्या जीवनात बदल घडले पाहिजेत याचे गणित नेहमी डोक्यात ठेवणारा हा गावाकडचा रांगडा माणूस.
पुण्यासारख्या शहरात येऊन उत्तम व्यवसाय करत आपले एक वेगळे विश्व मारणे यांनी निर्माण केले आहे. इथले राजकारणी मंडळी समाजातील उच्चपदस्थ व्यक्ती त्यांना जवळ बोलवतात, हा विश्वास निर्माण करणे म्हणजे एक अवघड गोष्ट म्हणावी लागेल.
समाजात त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे. ते व्यवसायातही उत्तम काम करतात. आपल्या मित्रांना बरोबर घेऊन त्यांनी समाजसेवेचा विडा उचलला आहे. बदलत्या काळात पारंपरिक आणि आधुनिकता यांचा संगम घालून एक नवा समाज उदयाला येतोय. तो भविष्यात खेडी आणि शहरे यांना जोडणारा असा समाज असेल आणि तो जोडण्यासाठी सुनीलशेठसारख्या पुत्रांची आज समाजाला खऱ्याअर्थाने गरज आहे. हाच आपल्या खऱ्याअर्थाने उद्याच भारत असेल.