शरद पवार यांनी केले आवाहन
मुंबई- लोकसभा निवडणुकांचा निकाल काय लागला हे पाहता आगामी विधानसभा निवडणुकांत होणारा धार्मिक उन्माद आवरायचा असेल तर धर्मनिरपेक्ष लोकांनी एकत्र यायला हवे. विधानसभा निवडणूक आता शंभर दिवसांवर आली आहे. आपला पक्ष,आपला उमेदवार जनमानसात कसा पोहोचेल याची खबरदारी घ्यायची आहे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
समाजात उन्माद कसा वाढेल यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी प्रचारात प्रयत्न केले. देशात बेरोजगारी हा महत्वाचा प्रश्न होता. आज देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. शेती व शेती व्यवसायातील अपयश किंवा शेतकरी आत्महत्या असो, हे चित्र मतदानातून व्यक्त होईल अशी अपेक्षा होती. परंतू मोदी यांनी सर्वांचा आढावा घेवून प्रचाराचे सूत्र दुसरीकडे वळवले. लोकांच्या भावनेला आवाहन करुन प्रखर राष्ट्रवाद वाढवला, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. देशाचे होत असलेले ऐक्य लक्षात घेता हे सरकार जाईल असे वाटले होते. परंतू पंतप्रधान यांनी केलेली आक्रमक भाषणे तरुण पिढीसमोर गेली. त्यामुळे वेगळे चित्र निर्माण झाले. त्यामुळे त्यांना यावेळी जास्त जागा मिळाल्या असेही शरद पवार म्हणाले.
येत्या निवडणुकीत तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. आपण आता एकजुटीने काम करूया,आपले घर अबाधित राखूया असेही शरद पवार म्हणाले.
ईव्हीएमबददल आजही संशय
अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रभाव आजच्या पंतप्रधानापेक्षा जास्त होता तरी त्यांचा पराभव झाला. त्यावेळी कुणी मशीनवर शंका घेतली नाही. राजीव गांधी यांचाही पराभव झाला. त्यावेळी कुणी शंका घेतली नाही. परंतु आजच का शंका बळावली आहे. या मशीनबाबत आम्ही कोर्टात गेलो. आता निकाल लागला तो मान्य केला. पण आजही जनमानसात संशयाचे व चिंतेचे असे वेगळे वातावरण आहे. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेत सावध राहायला हवे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.