सोलापूर – ‘माझी ही शेवटची निवडणूक होती या शब्दावर कायम आहे, परंतु लोकांसाठी काम करत राहणार, असं वक्तव्य सोलापूर मतदारसंघाचे पराभूत उमेदवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात ‘ही माझी शेवटची निवडणूक असेल’, असं भावनिक आवाहन शिंदे यांनी मतदारांना केलं होतं. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आज वृत्तमाध्यमांशी संवाद साधताना केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोकसभा मतदारसंघातून यावेळी भाजपतर्फे जय सिद्धेश्वर स्वामी, काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यांच्यामध्ये लढत झाल्याचं पाहायला मिळाला. लढतीमध्ये विरशैव लिंगायत समाजाचे जय सिद्धेश्वर स्वामी यांनी विजय प्राप्त केला आहे. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं. वंचित आघाडीमुळे मतांचं विभाजन झालं पर्यायानं त्याचा फटका युती आणि आघाडीलाही बसला. असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले यासोबतच त्यांनी विरोधकांवरही टीकस्त्र सोडलं आहे.