लगतच्या भागालाही पाणीपुरवठा ः पाणी समस्येची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न
देहूकरांचा बंधाऱ्यातून पाणी उचलण्यास विरोध
देहू बंधाऱ्यातून पाणी उचलणार असल्याचा मानस व्यक्त केल्यानंतर देहूकरांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या प्रयत्नाला विरोध दर्शविला आहे. देहू आणि लगतच्या ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. सहा महिन्यांपूर्वी याच विषयाला देहूकरांनी विरोध केला होता. त्यानंतर आतापर्यंत या विषयावर चर्चा झाली नव्हती. मात्र, पवना बंद जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आपली भूमिका मांडल्यानंतर देहू बंधाऱ्यातून पाणी उचलण्याच्या विषयाने पुन्हा उचल खाल्ली आहे. यापुढे देहूकर पिंपरी-चिंचवड पालिकेला किती सहकार्य करतील, यावर देखील देहू बंधाऱ्यातून पाणी आणण्याचा कालावधी अवलंबून राहणार आहे.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या कामांना होणारा विलंब लक्षात घेऊन, येत्या तीन महिन्यांत देहू बंधाऱ्यातून पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून तीन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी बुधवारी (दि.8) दिली.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाखांवर पोहचली आहे. शहराला पवना प्रकल्पातून दैनंदिन 376 एमएलडी पाणी वापरास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या पिण्याच्या पाण्याच्या मापदंडानुसार शहराच्या 22 लाख लोकसंख्ये साठी 135 लिटर माणसी प्रतिदिन + 15 टक्के वहन व्यय असे एकूण 155 .25 लिटर माणसी प्रतिदिन पाणी या प्रमाणे वार्षिक 341. 55 एमएलडी इतकाच पाणी वापर अनुज्ञेय आहे.
महापालिकेसह एमआयडीसीला पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होत असल्याने यासाठी धरणातून 760 एमएलडी इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे. मात्र, शहराच्या नागरीकरणाचा वेग लक्षात घेता हा पाणीपुरवठा भविष्यात अपुरा पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकेला आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातील पाणीसाठा उचलण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणण्याचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने, या ठेकेदाराने हे काम थांबविण्याची महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनासमोरील पेच आणखी वाढला आहे. परिणामी महापालिका प्रशासनाने आंद्रा व भामा-आसखेड धरणांमधून पाणी उचलण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
मात्र, या दोन्ही धरणांपासून शहरापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता, सध्या तरी देहू बंधाऱ्यातून पाणी उचलण्याचा पर्याय महापालिकेकडे उपलब्ध आहे.
त्यानुसार देहू बंधाऱ्यापासून चिखलीपर्यंत बंद पाईपलाईनमधून पाण्याचा उपसा करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर प्राधान्याने हे काम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. या पाईपमधून उचलले जाणारे पाणी चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाणार आहे. त्याठिकाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया झाल्यानंतर चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली व परिसरात पाणी वितरित केले जाणार आहे.