‘स्मार्ट कार्ड’साठी 31 पर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन
पुणे – सवलतीच्या पासधारकांना “स्मार्ट कार्ड’ देण्याची योजना महामंडळाने सुरु केल्यानंतर अवघ्या 8 दिवसांच्या कालावधीत महामंडळाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. महामंडळाच्या या अनागोंदी कारभाराचा फटका सवलतीच्या पासधारकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात पासधारकांनी तक्रारी केल्यानंतर महामंडळाला जाग आली आहे. त्यानुसार यासंदर्भातील अर्ज दाखल करण्यासाठी महामंडळाने 31 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पासधारकांना दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाच्यावतीने अंध, अपंग, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे पास देण्यात येतात. पंधरा ते वीस दिवसांचे भाडे दिल्यानंतर तब्बल महिन्याभराचा प्रवास होत असल्याने अनेक नोकरदार आणि अन्य घटकांनी या सवलतीच्या पासला पसंती दिली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या कालावधीत या पासमध्ये “गोलमाल’ होत असल्याचे निदर्शनास आले होते. विशेष म्हणजे लातूर येथे एका टोळीला महामंडळाच्या दक्षता आणि भरारी पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्या माध्यमातून गेल्या काही वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा गोलमाल झाल्याचे उघडकीस आले होते. त्याचा आर्थिक फटका महामंडळाला सहन करावा लागला होता. त्यामुळे सवलतीच्या पासमधील “गोलमाल’ थांबविण्यासाठी एसटी महामंडळाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या पासधारकांना “स्मार्ट कार्ड’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्य सर्व्हर बिघडल्यामुळे मध्यतंरी त्याचे अर्जच अपलोड होत नव्हते. ही समस्या तब्बल तीन दिवस उद्भवली होती. त्यानंतर मुंबई येथील मुख्य कार्यालयात तांत्रिक यंत्रणाच बिघडल्याने “स्मार्ट कार्ड’ तयार करण्याची प्रक्रियाच बंद पडली होती. त्यामुळेच या प्रक्रियेची मुदत आता 31 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.
पासधारकांनी घाबरून जाऊ नये
तांत्रिक समस्येमुळे विविध पासधारक विशेषत: विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे, हे अर्ज अपलोड होत नसल्याने आणि “स्मार्ट कार्ड’ तयार होत नसल्याने आता पास मिळणार नाही अशी अनेक पासधारकांची भावना झाली आहे. मात्र, नागरिक आणि पासधारकांनी घाबरुन न जाता महामंडळाच्या जवळच्या विभागीय कार्यालयात जाऊन अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा आणि आपली कागदपत्रे सादर करावीत त्यांना ही स्मार्ट कार्डे देण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी ग्वाहीही देओल यांनी दिली.
हायटेकचे घोडे मुहूर्तालाच अडले
हायटेकच्या होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या एसटी महामंडळाचे घोडे मुहूर्तालाच अडले आहे. त्यातच मुंबई येथील मुख्य कार्यालयात तांत्रिक यंत्रणाच बिघडल्याने “स्मार्ट कार्ड’ तयार करण्याची प्रक्रियाच बंद पडली होती. त्यामुळे एसटी महामंडळ खरच हायटेक होते आहे, असा यशप्रश्न निर्माण झाला आहे.