आठवडाभरानंतर पारा 36 अंश सेल्सिअसवर
पुणे – उष्णतेची लाट ओसरल्याने आठवडाभरानंतर पुणेकर नागरिकांना गेले दोन दिवसांपासून सुसह्य वाटत आहे. शहरात गुरुवारी दिवसभरात तापमानात लक्षणीय घट होऊन किमान 21.6 आणि कमाल 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आठवडाभरानंतर पुण्यातील कमाल तापमान चाळीस अंशाच्या खाली गेले आहे.
राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आलेल्या उष्णेतच्या लाटेने आठवडाभर नागरिक हैराण होते. मध्य महाराष्ट्रातील उष्णेतेच्या लाटेची तीव्रता रविवारी कमी झाल्याने कमाल तापमानात घट झाली होती. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र तापमान वाढले होते. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी कमाल आणि किमान तापमान घसरले. कोल्हापूर, महाबळेश्वर, सातारा, सांगली, नाशिकमध्ये तापमानाचा पारा अंशाच्या नोंदवला गेला. राज्यातील उच्चांकी तापमान 47.1 अंश सेल्सिअस ब्रह्मपुरीमध्ये नोंदविले गेले
पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात तापमानात दररोज वाढ होऊन शनिवारी शंभर वर्षांतील उच्चांकी 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. रविवारी तापमान 40 अंशांवर आले आणि सोमवारी पुन्हा लक्षणीय घट होऊन 37.7 अंश तापमान नोंदवले गेले. किमान तापमानातही घट झाली आणि पार 23. 3 अंशापर्यंत खाली आला. त्यामुळे दिवसभर ऊन होते; पण उन्हाची दाहकता कमी झाली होती. संध्याकाळी काही वेळ वाराही सुटला होता. पुढील दोन दिवस कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.