नियमांचे पालन न केल्याने अपघात;
पिंपरी – पिंपरी येथील इंदिरा गांधी पुलावर दुचाकीचा समोरा-समोर भीषण अपघात झाल्याने 52 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. 26) दुपारी तीन वाजता हा अपघात घडला. विजय कुंडलिक हरिहर (वय-52, रा. एमईसीबी कॉलनी, पिंपरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर, वत्सल किशोर जामिया (वय-17, रा. कोकणे चौक) हा गंभीर जखमी झाला आहे.
हरिहर हे भोसरी येथे कामाला होते, आपल्या दुचाकीने ते कामावरुन घरी जात होते. त्यांनी आपली दुचाकी विरुद्ध दिशेने आणि नो इंट्रीत पिंपरीच्या उड्डाणपुलावर आले. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली व हरिहर यांच्या डोक्याला व पायाला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. तर जामिया हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेच्या वेळी दोघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते. तसेच विरुद्ध दिशेने वाहतूक करणे हा गुन्हा असताना देखील शहरात बेदरकारपणे विरुद्ध दिशेने वाहने चालवली जात आहेत.
कायद्यातील भरातीय दंड कलम 279 नुसार विरुद्ध दिशेने जाणाऱ्यावर जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. अपघातात जखमी झालेला मुलगाही अवघ्या 17 वर्षाचा होता. त्यामुळे या वयात त्याला गाडी चालवायला दिल्या प्रकरणी त्याच्या पालकांचीही चौकशी होऊ शकते. कायद्यानुसार 18 वर्षानंतर मुलांना गाडी चालवता येऊ शकते. मात्र हा कायदाही केवळ कागदावरच राहिला असून बेदरकारपणे 15 ते 16 वर्षातील मुलेही गाडी चालवताना दिसतात.