कंगणा जशी पब्लिकबरोबर बिनधास्त पंगा घेत असते, तशीच तिची बहिण रंगोली पण त्याबाबतीत जरा ऍडव्हान्स आहे. रंगोलीने आलियाला आखाड्यात खेचण्यासाठी तिच्यावर शेरेबाजी करायला सुरुवात केली. पण तिच्या दुर्दैवाने आलियाने तिच्या शेरेबाजीकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यावर कोणतीही प्रतिक्रियाही दिलेली नाही. वशिलेबाजीच्या जुन्याच आरोपावरून रंगोलीने आलियाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. फॅमिलीच्या वशिल्यानेच जर कोणाला एखादा ऍवॉर्ड मिळत असेल, तर त्यात कर्तृत्व काय? असे रंगोली म्हणाली होती. आलियाच्या एकाही रोलमध्ये नावीन्य, चॅलेन्ज नाही, असे ती बिनदिक्कतपणे म्हणाली होती.
त्यावर आलियाने “मी मॅच्युअर आहे. माझा परिवार माझ्यापेक्षा दसपट जास्त मॅच्युअर आहे. त्यामुळे अशा कोणत्याही शेरेबाजीला उत्तर देणे आवश्यक आहे, असे मला वाटत नाही. मला या असल्या वादामध्ये पडायची अजिबात इच्छा नाही.’ असे आलिया म्हणाली. मला फक्त आनंदी, समाधानी आणि सकारात्मक रहायचे आहे. मला मेहनतीने यश मिळवायचे आहे. मला दररोज स्वतःमध्ये खूप सुधारणा करायची आहे, असे सांगून आलियाने आपली बौद्धिक उंची कंगणा किंवा रंगोलीपेक्षा जास्तच आहे, असे दाखवून दिले आहे.
आलियाला अलीकडेच “राजी’साठी फिल्मफेअर सिने ऍवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. आता तिला क्रिटिक च्यॉईस फिल्म ऍवॉर्ड समारंभातही सन्मानित करण्यात आले आहे. या ऍवॉर्ड सेरीमनीमध्ये “बधाई हो’साठी 74 वर्षीय सुरेखा सिकरीला सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर बॉलीवूडमधील पहिली महिला स्टंटवुमन रेश्मा पठाणला “एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आले. “मुक्केबाज’मधील रोलसाठी विनित कुमारला सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार, “अंधाधुन’साठी श्रीराम राघवनला सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचा पुरस्कार आणि संगीतकार अमित त्रिवेदीला “मन मर्जियां’मधील “हल्ला’गाण्यासाठी सर्वोत्कृष्ठ संगीतकाराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.