Lok Sabha Election 2024 | हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा भारत आहे. त्यामुळे तुम्ही मला घाबरवून घरी पाठवाल असे होणार नाही. सगळ्या पप्पूंना माझे आव्हान आहे अशा शब्दांत आपल्या प्रचार सभेत अभिनेत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या हिमाचल प्रदेशातील मंडी येथील उमेदवार कंगना रणावत यांनी शाब्दिक आतषबाजी केली.
प्रचारसभेत बोलताना त्यांनी शिवसेना उबाठाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आपल्या पित्याची जहागिरी मानणारे असे अनेक जण मला प्रत्येक ठिकाणी भेटले. चित्रपटसृष्टीतही अशी मंडळी मला भेटली आणि मी त्यांच्या विरोधात आवाज उठवला. ते मला गायब करू शकले नाहीत उलट मीच त्यांना चित्रपटातून गायब केले. आणखी एक पप्पू माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी मुंबईत माझे घरच तोडले. जे नवे लोक आहेत किंवा जे बाहेरचे आहेत त्यांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे. घराणेशाहीच्या विरोधात माझा कायमच संघर्ष राहीला आहे. ते (विरोधक) घाबरलेले आहेत. तसे जर नसते तर त्यांनी एका महिलेच्या विरोधात अशी टिप्पणी केली नसती. मला वाटते आयुष्यभर मला घराणेशाहीशीच संघर्ष करावा लागणार आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली.
हिमाचल प्रदेशातील कॉंग्रेस सरकारबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की हे तुटते-फुटते सरकार आहे. कधीही जाईल. जनतेला दाखवण्यासारखे काहीही काम त्यांच्याकडे नाही. या भागाचा विकास करणे हाच आमचा निवडणुकीचा मुद्दा आहे. आज संपूर्ण देशात महिलांची आणि देवींची पुजा करतो आहे मात्र कॉंग्रेसच्या महिलाविरोधी विचारधारेला अजुनही पूर्णविराम मिळाला नाही. मला मंडी येथून उमेदवारी दिल्याची घोषणा झाल्यापासून ते रात्रंदिवस माझा अपमान करण्याच्या प्रयत्नांत गुंतले आहेत.