पुणे – मतदान बूथवर मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरे (तात्पुरता वेळ मुलांना सांभाळण्यासाठी) सुरू केली होती. मात्र, त्याठिकाणी एकाही पालकांनी आपल्या मुलांना सोडले नाही. त्यामुळे त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही.
मतदान करण्यासाठी आलेल्या मतदात्यांना रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांच्या लहानमुलांना सांभाळण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हे पाळणाघर सुरू करण्यात आले होते. यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली होती. मतदारांनी मात्र मुलांना घरी सोडून येणे पसंत केले. परंतु, ज्यांची तान्ही मुले आहेत त्यांनी कुटुंबातील व्यक्तींना सोबत आणले होते. त्यामुळे त्या मुलांना सांभाळण्याचे काम कुटुंबातील सदस्यांनीच केले.
वास्तविक ज्यांची मुले लहान आहेत अशा महिलांनी सकाळी उन्हाच्या आत आणि संध्याकाळी साडेचार वाजल्यानंतर मतदान करण्यावर जास्त भर दिला. तरीही बुथवर या सेविकांची नियुक्ती करण्यात आली होती.