नांदेड – अशोक चव्हाणांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना प्रचारासाठीही भाडोत्री नेता आणावा लागला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. नांदेडच्या भोकरमधील सभेत ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी नांदेडमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राशी काहीही देणेघेणे नाही. त्यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळवण्याचा डाव आखला असल्याचा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राज ठाकरे माझ्यावर आरोप करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तुम्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही २ हजार २२६ कोटी थेट शेतकऱ्यांना दिले हे तुम्ही कसे विसरता? असा प्रश्नदेखील मुख्यमंत्र्यांनी विचारला.
शेतकऱ्यांची वाईट अवस्था आम्ही जाणतो म्हणूनच शेतकरी साठ वर्षांचा झाला की त्यालाही पेन्शन देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गरीबी हटावचा नारा राहुल गांधी देत आहेत. इतक्या वर्षांनी ही घोषणा देताना त्यांना लाज कशी वाटत नाही? असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधीवरही निशाणा साधला.