पिंपरी- एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी नामसाधर्म्य असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा प्रकार यावेळी मात्र हद्दपार झाला आहे. गतवर्षी मावळ लोकसभा निवडणुकीत दोन मुख्य उमेदवारांशी नामसाधर्म्य असलेले तीन उमेदवार उतरवण्यात आले होते. यामुळे दोन नावांचे पाच उमेदवार रिंगणात होते. यावेळी एकही डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकसारखे दिसणारे निवडणूक चिन्ह, एकाच नावाचे उमेदवार उभे करणाचा प्रयत्न प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून प्रत्येक निवडणुकीत पहावयास मिळतो. मात्र यावेळी होत असलेल्या मावळ लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकाही उमेदवाराचे नाव सारखे नसल्याचे आज छाननीनंतर स्पष्ट झाले आहे. गतवेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन श्रीरंग बारणे तर तीन लक्ष्मण जगताप मावळ लोकसभेच्या निवडणुकीत उभे होते.
आपल्या प्रतिस्पर्ध्यासारखे नावात साधर्म्य असलेला उमेदवार शोधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा प्रकार वेळोवळी पहावयास मिळत होता. केवळ वडिलांचे नाव बदलत असल्याने सारखे नाव असल्यास कमी शिकलेल्या अथवा अशिक्षित मतदारांचा संभ्रम होऊन विरोधकांची मते कमी करण्याचा डाव या पाठीमागे असायचा. मात्र यावेळी प्रमुख एकाही उमेदवाराच्या नावात साधर्म्य असलेला प्रतिस्पर्धी ईव्हीएम मशीनच्या बॅलेटवर असणार नाही. त्यामुळे नावांमध्ये संभ्रमही होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.