मेढा – केंजळ व मोरखिंड येथील दगडांच्या खाणीचे काम विनापरवाना सुरू होते. येथील ग्रामस्थांची कोणतीही परवानगी याठिकाणी घेतली नव्हती. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. केंजळ, ता. जावली येथील दगडाच्या खाणीचे गौडबंगाल झाल्याची चर्चा केंजळ पंचक्रोशी परिसरात सुरू होती. कोणत्याही विभागाची परवानगी न घेता व केंजळ ग्रामपंचायतीचा ठराव व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचा ठराव न घेता मनमानी डोंगरातील दगड खनिजला जाणाऱ्या रस्त्याचे काम शेतकऱ्यांच्या जमिनीतून होत असल्याने जावली तालुक्याचे नेते व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी घटनास्थळी जावून केंजळ ग्रामस्थांच्या सहकार्याने काम बंद पाडले.
केंजळ येथील खाणकाम करण्यासाठी महसूल विभागाला दगडखाण करणे कामी महसूल भरण्यात आला. परंतु, ज्याठिकाणी खाणकाम करणार आहेत त्या 62/1मधील जागेमध्ये 40 शेतकरी आहेत. त्यांची हरकत घेण्यात आली नाही. तसेच जी जमीन रस्त्यासाठी घेतली जातेय त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला नाही. केंजळ गावातील दगड खाण बंद करावी, यासाठी सर्व कायदेशीर बाबी पडताळून केंजळ ग्रामस्थ व वसंतराव मानकुमरे यांनी निर्णय घेतला असून जोपर्यंत पर्यावरण, बांधकाम, भूजल विभागाची, ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात येत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सपोनि नीलकंठ राठोड यांनी सुरुवातीला ग्रामस्थांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थांच्या बाजूने मानकुमरे यांनी आपली बाजू भक्कमपणे कागदपत्रांच्या पुराव्यानिशी माडूंन पोलीसांची दमबाजी थांबवत आम्हाला अटक केली तरी चालेल परंत, आता माघार घेणार नाही, अशी भुमिका घेतली. केंजळ ग्रामस्थांच्या जमिनीवर ठेवण्यात आलेल्या क्रशर, जेसीबी, पोकलॅन व इतर साहित्य हटवण्यात आले. एखाद्याच्या शेतात जमिनीची लेवल करण्यासाठी मुरूम बाजुला केला महसुल विभाग लाखोंचा दंड संबधित शेतकऱ्याला भरायला सांगतो.
केंजळच्या इथं कसलीही परवानगी न काढता डोंगरात चारशे मीटर रस्ता केला जातो. त्यावेळी तिकडं पाहिलंही जात नाही मग नक्की प्रशासनाची या मागची भुमिका काय आहे ? अशी संशयाची सुई ग्रामस्थांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. डोंगरात रस्ता करीत असताना रस्त्यात येणारी सागवानाची झाडे वनविभागाची परवानगी न घेताच रस्त्यात गाडली गेली. यावर संबंधितावर गुन्हे दाखल होणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.