भारतीय लोकशाहीचा अखंड ठेवा जतन करण्यासाठी नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. देशाचे ऐक्य, एकात्मताबरोबर एकसंघ भारताच्या स्वप्न पूर्तीसाठी मी मतदान करणार व इतरानाही मतदान करण्यासाठी प्रवृत करणार हा निर्धार आता सर्व घटकांनी करणे आवश्यक आहे. या विषयी श्रीरंग काटेकर, सातारा यांचा विशेष लेख
देशातील मतदानाचे घटते प्रमाण हे भारतीय लोकशाहीला मारक ठरत आहे. विशेषता सुशिक्षित मतदारांचे घटते प्रमाण अधिक असल्याने ते चिंताजनक वाटत आहे. देशाअंतर्गत लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने मतदानाचा आपला हक्क बजावून मतदानांची टक्केवारी वाढवली पाहिजे. यासाठी शासन स्तरावर व सामाजिक संस्थाकडून वेगवेगळया पातळीवर होणारी जनजगृती व प्रबोधन आपण गार्भीयाने घेतली पाहिजे. भारतीय लोकशाही आज सर्व जगात सर्वश्रेष्ठ मानली जात आहे.
नागरिकांनी नैराश्यवादी विचाराना मूठमाती देऊन, सकारात्मक भूमिका घेऊन मतदान जागृतीचा ध्यास घेऊन वाटचाल होणे खरेतर गरजेचे आहे. मानवी स्वभावानुसार माणूस हा स्वत:चा स्वार्थ पाहतो. परंतु स्वार्थीपणामुळे स्वत:चे जरी भले झाले तरी समाजाचे मात्र मोठे नुकसान होते.
श्रीरंग काटेकर, सातारा
येथील लोकशाही प्रणालीचा संपूर्ण जगाला हेवा वाटतो म्हणूनच आपण भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी पुढे आले पाहिजे. देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. “मतदान करुया लोकशाही बळकट करुयाचा’ नारा आता सर्वत्र दिला जात आहे. आपले नाव मतदान यादीमध्ये आहे का नाही हे आपण जागरुक नागरिक म्हणून पाहणे गरजेचे आहे. लोकशाहीमध्ये आपल्या मताला खुप महत्व आहे. याची जाणीव ही आपण ठेवली पाहिजे.
माझ्या एका मताने भाऊ काय फरक पडणार आहे? कोणीही निवडून आले तरी आपल्याला काय लाभ होणार? असा शेलक्या व मोजक्या शब्दात व्यक्त होणाऱ्या सुशिक्षीत नागरिकांच्या भावना हे भारतीय लोकशाहीला मारक ठरत आहे. मी भारतीय आहे. भारतीय घटनेचा मला सार्थ अभिमान आहे. घटनेने दिलेला लोकशाहीतील मतदानाचा हक्क मी बजावणारच आणि भारतीय लोकशाही अधिक मजबूत व सक्षम करण्यासाठी मी मतदान करणारच आणि इतरानाही मतदानाचे महत्व पटवून देणारच या विचाराची व कृतीची जोड असणाऱ्या वृत्तीची वाढ होणे ही खरी राष्ट्राची गरज आहे. आपल्या मतानुसार आपले लोकप्रतिनिधी व शासन निवडून देण्याची ताकद आपल्या एका मताच्या अधिकारात प्राप्त झाली आहे. या अधिकाराचा वापर आपण केला तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या बळकटीसाठी पुरक ठरणार आहे.