मुुंबई – तुमच्या काळात हजारो कोटींचा सिंचन घोटाळा झाला… त्याची लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री पदावर असताना आदर्श घोटाळा केला, त्यामुळे मुख्यमंत्रीपद घालवावे लागले, त्याची लाज कशी वाटत नाही… शेतकऱ्यांनी पाणी मागितले तर धरणात करंगळी वर केली, याची लाज वाटत कशी वाटत नाही… असे रोखठोक प्रत्युत्तर देत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी “लाज कशी वाटत नाही’ हे विचारायला तुम्हालाच लाज कशी वाटत नाही… अशा शब्दात विरोधकांचे वाभाडे काढले.
कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीने मंगळवारी केंद्र व राज्य सरकारच्या पाच वर्षांतील आश्वासनांची पूर्तता न करता पुन्हा मते मागायला येताना सरकारला ‘लाज कशी वाटत नाही’ या निवडणूक प्रचाराच्या टॅगलाईनच्या माध्यमातून सरकारला जनतेच्या मनातील प्रश्नांचा जाब विचारणार असल्याची घोषणा केली. या टॅगलाईनचा राज्य सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चांगला समाचार घेतला. निवडणूक प्रचाराची टॅगलाईन करणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्याला इतके निगरगट्टपणे “लाज कशी वाटत नाही’ हे कसे विचारु शकतात असा सवाल करताना तावडे म्हणाले की, साडेचार-पाच वर्षात आमच्या सरकारने विकासाची काम केली, आपल्या देशाची सुरक्षा वाढली तसेच खऱ्या अर्थाने या राष्ट्राची आर्थिक प्रगती झाली, त्याचा अभिमान कॉंग्रेस आघाडीला वाटला पाहिजे. ते सोडून केवळ राजकारणासाठी इतक्या निगरगट्टपणे कुठला पक्ष कसे कॅम्पेन करु शकते याचे आश्चर्य वाटते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी बहुधा गेल्या 10 वर्षांत प्रथमच शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलेले आपल्या वाचनात आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे मनापासून बोलले की, निवडणूकीपूरते बोलले. निवडणूकीसाठी महाआघाडी म्हणून एकत्र आले आहेत, त्यामुळे अजित पवार यांच्या बाजूने बोलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे का? हे एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याला सांगावे, असा टोलाही तावडे यांनी लगावला.