पिंपरी, (प्रतिनिधी) – उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक घटली असल्याने कडधान्ये आणि डाळींना मागणी वाढली आहे. तर देशाच्या काही भागांमध्ये डाळी व कडधान्याचे उत्पादन कमी झाल्याने दरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी – चिंचवड परिसरातील बाजारपेठेत चवळी, मटकी, हरभरा डाळ, मूग, मसूरला मोठी मागणी दिसत आहे.
कडधान्ये आणि डाळी शरीरासाठी पोषक असल्याने नागरिक वेगवेगळ्या कडधान्यांचे व डाळीचे सेवन करतात. आताच्या उन्हाळयामध्ये या डाळींना जास्त मागणी असलेले दिसत आहे. मूगडाळ पचनास हलकी व आरोग्यासाठी चांगली असते तर उडदाच्या डाळीमध्ये प्रथिने, खनिजे आणि अनेक जीवनसत्त्वेही आढळतात. त्यामुळे याचे सेवन लाभदायक मानले जाते.
आजचे डाळीचे दर – मूग १२० ते १४०, वाटाणा – १०० ते १४०, हरभरा डाळ १०० ते १२०, उडदाची डाळ १२० ते १४०, पावटा १४० ते १६०, छोले, १५० वे १८०, मसूर ८५ ते १००, चवळी १२० ते १४०, मटकी १५० ते १७० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहेत. उन्हाळ्यामध्ये तेजी सुरू झाल्यामुळे संपूर्ण वर्षभर ही भाववाढ सुरू राहण्याचा अंदाज चिंचवडगाव येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.