पिंपरी (प्रतिनिधी) – मनाला मिळते ते समाधान, शरीराला मिळते ते सुख, आणि आत्म्याला मिळते तो आनंद. भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्त्वाचा आहे. आचार, विचार, आहार, विहार यांच्या द्वारे आदर्श आचरणाने जीवन सुंदर होऊ शकते. आपले जीवन आपणच सुंदर बनवू शकतो, असे प्रतिपादन लेखक राजेंद्र घावटे यांनी केले.
मोरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेत जगणे सुंदर आहे या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. आर. माडगूळकर होते. व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, साहित्यिक डॉ. दिलीप गरुड, उद्योजक भगवान पठारे, यशवंत आपटे उपस्थित होते.
राजेंद्र घावटे म्हणाले की, आयुष्य हा ऊनपावसाचा, आशा निराशेचा प्रवास आहे. आयुष्यात येणारी संकटे, अडीअडचणी, नैराश्य, दुःख, सुख, आनंद या सर्व गोष्टीमुळे जगण्याची चव वाढते. दुःखाने माणूस डोळस बनतो आणि अडचणीमुळे अनुभव वाढतात. सिंहावलोकन करून जीवनातील प्रत्येक क्षण जपता आला पाहिजे.
मृत्यू हे आयुष्याचे अंतिम आणि अटळ सत्य आहे. त्याची भीती न बाळगता दिलेल्या आयुष्यात स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रास्ताविक अरविंद देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन उल्हास झिरपे यांनी केले.