शेतकरी आक्रमक : पाणी बंद केल्यास पुन्हा कालवा फोडू
यवत- खडकवासला कालवा फोडून दौंड तालुक्यातील वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावात पाणी सोडण्यात आले. यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी कालवा बंद केल्यास फोडण्याचा इशारा दिला आहे.
वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठ्यावर कुरकुंभ औद्योगिक वसाहत कंपन्या, अनेक गावांचा जलजीवन पाणीपुरवठा योजना तसेच बारामती तालुक्यातील जानाई शिरसाई योजनाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. खडकवासला कालवा दौंड तालुक्यातील वाहत आहे. मात्र, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडले जात नाही.
दोन अडीच महिन्यापासून दौंड तालुक्यातील पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी तालुक्यातील गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग पाच गावांतील पिण्यासाठी पाण्याची टँकर सुरू करण्यात आले आहेत.
नागरिक आणि शेतकरी अनेक दिवसांपासून जलसंपदा विभागाकडे पाणी सोडण्यासंदर्भात वारंवार आपले म्हणणे मांडत होते. परंतु पाणी सोडण्यासंदर्भात अधिकारी टाळाटाळ करीत असत. अखेर या त्रासला कंटाळून वरवंड ग्रामपंचायत प्रशासन मंगळवारी (दि.22) खडकवासला कालव्याचा वरंवड तलावातील पाणी सोडण्याच्या वितरिकेचे दोन दरवाजे तोडून तलावात पाणी सोडले.
पाटबंधारे विभागाने हे दरवाजे बंद केल्यास पुन्हा दरवाजे तोडून पाणी सोडण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासन यांनी दिला आहे. वरवंड ग्रामपंचायतीचे सरपंच मीनाक्षी दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, सदस्य तानाजी दिवेकर, प्रदीप दिवेकर, कांतीलाल टेंगले, मीना रामदास दिवेकर, अर्चना रणधीर, संगीता सातपुते, फर्जना शेख, मीरा दिवेकर, मंदाकिनी खोमणे, मारुती फरगडे आदींनी पाणी सोडण्यासाठी आक्रमक पवित्र घेतला.