पुणे – पार्थ पवार हे अतिशय सज्जन गृहस्थ असून त्यांचे कोणाशी राजकीय वैर, गुन्हेगारीशी संबध नाही. हे पाहता राज्य गृह विभागाने आचारसंहिता काळात त्यांना “वाय प्लस’ सुरक्षा व्यवस्था पुरविणे योग्य नाही. या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.
तर, आमदार रोहित पवारांना प्रचारकाळात धमक्या देण्यात आल्या. त्यांना सुरक्षा देण्याबाबत शासनाला वेळ नसल्याचीही टीकाही काकडे यांनी यावेळी केली आहे. काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली होती. त्यानंतर पार्थ पवार चांगलेच चर्चेत आले होते.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांच्याकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. असे असतानाच शासनाकडून त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याने त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
याबाबत काकडे म्हणाले, “आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे सुरक्षा देणे योग्य नाही. त्यांना कोणतीही धमकी आलेली नाही किंवा त्यांना कोणताही धोका असल्याची तक्रार अथवा घटना घडलेली नाही. असे असताना त्यांना सुरक्षा द्यावी, असे शासनाला का वाटते असा सवाल उपस्थित करत आमदार रोहीत पवार यांना थेट धमक्या असताना शासनाकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी करूनही करण्यात आलेले नाही,’ असे काकडे यांनी म्हटले आहे.