पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- भारत हा मुळात उत्सवांचा देश असून, निसर्गाच्या अनेक घटकांशी सहसंबंध प्रस्थापित होतील, अशा अनेक उत्सवांचे मूळ भारतात आढळते. नद्यांना जीवनवाहिनीचे महत्त्व दिलेले असताना त्यांचे होणारे बेसुमार प्रदूषण मनुष्यजातीच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
मनुष्याचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी नद्यांना पुनर्सन्मान प्राप्त होणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध नदी अभ्यासक आणि साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपलच्या असोसिएट कोऑर्डिनेटर परिणिता दांडेकर यांनी व्यक्त केले.
राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तिच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा, तिची स्वच्छता राखण्यासाठी तरुण पिढी प्रेरीत व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या राम नदी पुनरुज्जीवन अभियानला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित चौथ्या ऑनलाइन ‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सवा’चे उद्घाटन दांडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी निमंत्रक आरती किर्लोस्कर, संयोजक वीरेंद्र चित्राव, अध्यक्ष आर. आर. देशपांडे, फॅसिलिलेटर आनंद चितळे आणि क्यूरेटर डॉ. गुरूदास नूलकर उपस्थित होते.
पुण्यातून वाहणाऱ्या राम नदीचे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय असून, या नदीभोवती वाढणारे शहरीकरण प्रदूषणात भर घालत आहे. अतिक्रमणामुळे नद्यांची पात्रे अरुंद आणि प्रदूषित होत आहेत. स्थानिक पुणेकरांनी दबावगट तयार करून राम नदीवर सुएझ प्लान्ट बसवण्यासंदर्भात महापालिकेवर दबाव वाढवावा, असे मत दांडेकर यांनी व्यक्त केले.
चितळे, चित्राव यांचेही भाषण झाले. हा महोत्सव २८ मार्चपर्यंत ऑनलाइन होणार असून, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ ते १२ या वेळेत त्याचे प्रसारण होईल. हा महोत्सव विनामूल्य असून, ‘KirloskarVasundhara’- https://www.facebook.com/kirloskarvasundharafilmfest या फेसबुक पेजवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.