पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या उपायुक्त चेतना केरूरे, संतोष वारुळे आणि आशा राऊत यांची बदली झाली आहे. दरम्यान, केरूरे यांच्याकडे महापालिकेच्या निवडणूक विभागाची जबाबदारी होती. त्यामुळे, त्यांच्या बदलीनंंतर पालिकेची कोंडी झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारने जिल्ह्यामध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्या अंतर्गत दोन दिवसांपूर्वीच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त प्रसाद काटकर यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे महापालिका उपायुक्त चेतना केरूरे, संतोष वारुळे आणि आशा राऊत यांना तीन वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचीही बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिकेत उपायुक्तांची १८ पदे असून त्यातील ९ पदे शासन नियुक्त अधिकाऱ्यांसाठी तर ९ पदे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बढतीने दिली जातात. शासनाकडून काही महिन्यांपूर्वी ही पदे भरली गेली. मात्र, गेल्या सहा महिन्यांत सहा उपायुक्तांची पालिकेतून बदली करण्यात आली आहे.
त्यामुळे पालिकेतील अनेक विभागांचे कामकाज ऐन मार्च अखेर तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रखडले आहे. पालिकेत आता केवळ तीन शासन नियुक्त उपायुक्त कार्यरत असल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता आहे.