Nepal News : नेपाळमध्ये १६ वर्षांपूर्वी मोठे आंदोलन करून राजेशाहीची सत्ता संपुष्टात आणण्यात आली होती. तत्कालिन राजे ग्यानेंद्र यांनी नेपाळला प्रजासत्ताक म्हणून घोषित केले होते. आता नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही लागू करण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे.
नेपाळमध्ये प्रजासत्ताक लागू झाल्यापासून जेवढ्या राजकीय पक्षांचे सरकार आले होते, त्या सर्वांवर आता भ्रष्टाचाराचे आणि प्रशासनात अपयशी ठरल्याचे आरोप केले जाऊ लागले आहेत. देशातील जनता राजकीय नेत्यांना कंटाळली आहे. त्यामुळे पुन्हा राजेशाहीची मागणी होऊ लागली आहे.
राजेशाही पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी अलिकडेच राजधानी काठमांडूमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला होता. नेपाळच्या अन्य भागांमध्ये लहानमोठ्या प्रमाणात ही मागणी करण्यासाठी निदर्शने केली जाऊ लागली आहेत. या निदर्शनांमधून माजी राजे ग्यानेंद्र यांची पोस्टर झळकू लागली आहेत.
प्रजासत्ताक लोकशाही लागू झाल्यावर राजे ग्यानेंद्र हे २००५ पर्यंत कोणत्याही कार्यकारी आणि राजकीय अधिकारांशिवाय राष्ट्रप्रमुख होते. मात्र २००५ मध्ये त्यांनी सर्व अधिकार आपल्या हाती एकवटले आणि संसद विसर्जित केली. विरोधक, पत्रकारांना तुरुंगातटाकून देशात आणीबाणी लागू केली होती.
त्याचा परिणाम म्हणून त्यांच्याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले आणि त्यांना २००६ मध्ये सर्व अधिकार संसदेच्या हवाली करणे भाग पडले होते. त्याच्या २ वर्षांनी राजेशाही विसर्जित केली गेली. मात्र तेंव्हापासूनच्या राजकीय अस्थिरतेला नेपाळची जनता कंटाळली आहे.
२००८ मध्ये राजेशाही संपुष्टात आल्यापासून नेपाळमध्ये १३ सरकारे झाली आहेत. राजेशाही पुन्हा आणण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा आंदोलन झाले. पण पोलिसांनी ते दडपले होते.
राजा म्हणजे विष्णूचा अवतार –
नेपाळमध्ये राजांना विष्णूचा अवतार मानले जाते. भारत, चीन आणि अमेरिकेसारख्या देशांचा प्रभाव देशावर होऊ नये, यासाठी नेपाळच्या राजांना देशाचे रक्षक मानले जाते. देशाची मूल्ये आणि तत्वे जपण्यासाठी राजेशाही आवश्यक असल्याचे काही आंदोलकांनी म्हटले आहे.