नवी दिल्ली – मोदी सरकार हा देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक शाप आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक देत असल्याचा आरोपही खर्गे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा (एमएसपी) कायदेशीर अधिकार फक्त काँग्रेस पक्षच देऊ शकतो, असेही खर्गे यांनी ठामपणे म्हटले आहे. एक्स वरील पोस्टवर खर्गे यांनी म्हटले आहे की,
मोदी सरकार हे देशातील जनतेला अन्नधान्य देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शाप आहे. सततच्या खोट्या मोदी हमीमुळे आधी ७५० शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आणि आता काल १ शेतकरी आंदोलन स्थळी शहीद झाला आहे,
तर पोलिसांनी मारलेल्या रबरी गोळ्यांमुळे ३ जणांची दृष्टी गेली आहे. शंभु सीमेवर शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून त्यांना रोखले गेले आहे त्यावेळी झालेल्या झटापटीत शेकडो शेतकरी आणि काही पत्रकारही जखमी झाले आहेत त्या संबंधात खर्गे यांनी ही टीका केली आहे.