छत्रपती संभाजीनगर – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे व ते भाजपच्या संपर्कात असल्याचे ऐकण्यात आले आहे. त्यामुळे कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप पक्ष आज काँग्रेसव्याप्त होत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लगाविला. तसेच भविष्यात भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल असे भाकीत केले त्यांनी केले.
त्याचबरोबर भाजप भाडोत्री- बाजारबुणगे घेतंय आणि निष्ठावंतांना सतरंज्या उचलायला लावतंय, असाही टोला त्यांनी लगावला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, अशोक चव्हाण यांचे मला आश्चर्य वाटते. कालपर्यंत जागावाटपामध्ये भाग घेत होते. पण आज असे अचानक काय घडले? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आता मला असं वाटतं की, त्यांना राज्सभेची जागा देत आहेत. म्हणजे प्रत्येकजण आपापलं बघतो आहे. मग माझ्या शेतकऱ्यांचं दु:ख आहे, ते कोण पाहणार?, असेही ठाकरे म्हणाले.
या निर्दयी सरकारला देशातील शेतकरी व त्यांच्या आत्महत्यांकडे पाहायला वेळ नाही. शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असून बळीराजा कर्जबाजारी होत आहेत. मोदी सरकारमध्ये हिंमत असेल तर संपूर्ण देशात निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करावी असे, आव्हान ठाकरे यांनी केंद्रातील सरकारला दिले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील फटकारे –
– मी मुख्यमंत्रीपदाची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलेलो नाही, मी जनतेच्या आयुष्याची लढाई लढायला मैदानात आहे
– डरपोक, भेकड, भ्रष्ट लोकांना मी आजही सांगतोय, भाजपमध्ये जा!
– जिथे कमी तिथे आम्ही म्हणणाऱ्या भाजपमध्ये आज अचानक वक्ते आणि कार्यकर्त्यांची कमी का भासायला लागली?
– भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा!
– आता ‘काँग्रेसव्याप्त भाजपा’ म्हणावं लागेल. भविष्यात भाजपचा अध्यक्ष काँग्रेसची एखादी व्यक्ती असणार.
– तुम्ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही, मतदारांसोबत केली आहे.
– रावणाला शिवधनुष्य नाही पेललं, तर या पन्नास खोकेवाल्यांना काय पेलणार आहे?
– आमच्याकडे चौकीदार नाहीत, शिवसेनेचे राखणदार आहेत!
– शेतकरी ‘जात’ मानत असाल, तर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचं कर्ज अजून जात का नाही?
– तुमच्या लेखी जनता कुत्र्या-मांजरासारखी असेल, तर मतं कुत्रे-मांजराकडे मागा. पण यांना कुत्रासुद्धा मत देणार नाही, कारण कुत्रा इमानदार असतो.
अशोक चव्हाण यांच्या काॅंग्रेसच्या राजीनाम्यानंतरच्या राजकीय प्रतिक्रिया –
अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याचा निर्णय आपल्यासाठी धक्कादायक आहे. पण, ज्या पद्धतीने भाजप पक्ष फोडण्याचे आणि इतर पक्षांचे नेते पळवण्याचे काम करत आहे, या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे. मतदारराजा या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागला असून येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना नक्कीच धडा शिकवेल.
– विजय वडेट्टीवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहेत. ईडीच्या चौकशीवर ज्यांना हवे त्यांना नाचवतील. मग ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ असतील किंवा तळागाळातील असतील. त्यांना ते नाचवल्या शिवाय राहणार नाही. मात्र, याचा मतांवर परिणाम होईल असे वाटत नाही. कारण ७५ टक्के लोकांनी आपले मत तयार केले आहे.
– प्रकाश आंबेडकर, वंचितचे अध्यक्ष
अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तसेच त्यांचा निर्णय हा अनपेक्षित आहे. परंतु ते जरी पक्षातून बाहेर पडले असतील, तरीही त्यांच्यासोबत एकही आमदार बाहेर पडणार नाही.
– पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते